Breaking News

सुनिल तटकरे यांची स्पष्टोक्ती, अजित पवार यांची बीड येथे उत्तरदायित्व सभा होणारच… उद्याच्या सभेनंतर राज्यव्यापी दौरा करणार

बीडमधील प्रभू वैजनाथाच्या चरणी नतमस्तक होऊन राज्यातील जनतेसमोर संवाद साधण्यासाठी बीड येथे जाहीर सभेचे आयोजन केले आहे. ही उत्तरदायित्वाची सभा आहे. लोकांचे आम्ही उत्तरदायित्व मानत आलो आहे त्यामुळे आम्ही घेतलेली भूमिका व करायचे काम आणि ध्येयधोरणे याची स्पष्टता व्हावी. राज्यभर जे काही दौरे पुढच्या कालावधीत करणार आहोत त्या दौऱ्याची सुरुवात उद्याच्या बीडच्या सभेने होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सुनिल तटकरे म्हणाले, २ जुलैला अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्व नेत्यांनी एकत्रित बसून सामुदायिक निर्णयातून एनडीएमध्ये आणि राज्यातील महायुती सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यात आमच्या नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला. ५ जुलैला एमएटीच्या मेळाव्यात आम्ही घेतलेल्या भूमिकेची पार्श्वभूमी राज्याला अजितदादा पवार यांनी सांगितली. आमची धर्मनिरपेक्षता ही मूळविचारधारा आहे. शाहू, फुले, आंबेडकरांची आहे. त्या विचारांवर ठाम विश्वास ठेवत आणि ती विचारधारा पुढे नेत महायुती सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला असेही सांगितले.

पुढे बोलताना सुनिल तटकरे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संघराज्य व्यवस्थेमध्ये केंद्र व राज्याची भूमिका स्पष्ट केली. महाराष्ट्राला अधिक गतीमान पध्दतीने विकासाच्या मार्गावर न्यायचे असेल तर देशामध्ये नरेंद्र मोदी नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार आणि राज्यातील महायुतीत जाण्याचा निर्णय घेतला. त्यातून पक्षाची वाटचाल सुरू असल्याचे दिसत आहे. हा निर्णय घेत असताना घटनात्मक कायदेशीर सर्व बाबींची पूर्तता करत हा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट करतानाच जवळपास दीड महिन्याच्या कालावधीत घेतलेल्या निर्णयाची सरकारच्या माध्यमातून अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील आमचे सर्व मंत्री भूमिका बजावत असल्याचे स्पष्ट केले.

सुनिल तटकरे म्हणाले की, राज्यातील जनतेसमोर पक्ष म्हणून अजित दादांच्या नेतृत्वाखाली मंत्र्यांवर वेगवेगळ्या जिल्हयाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांचा जनता दरबारसुध्दा सुरू करण्यात आला आहे.

पुढे बोलताना सुनिल तटकरे म्हणाले, पक्षाची संघटना बांधणी सुरुच आहे. परंतु त्याचबरोबर राज्यव्यापी दौरेही करणार आहोत. पक्षाची भूमिका मांडून, कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहोत. हे सगळे करताना महायुतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस करणार आहे. अजितदादा पवार हे कामाने झपाटलेले विलक्षण नेतृत्व आहे. शब्दाचा पक्का माणूस आहे. या नेतृत्वाखाली काम करत असताना तरुणांचे, बेरोजगारांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कटिबद्ध आहे असा शब्दही दिला.

उद्याच्या निवडणूका अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर आम्ही लढवू असे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसची जाहीर सभा बीड येथे २७ ऑगस्टला होत असून त्याच्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनिल तटकरे यांनी छत्रपती संभाजी नगर येथे आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला आमदार सतीश चव्हाण, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, शहराध्यक्ष अभिजित देशमुख उपस्थित होते.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *