Breaking News

धनंजय मुंडेंचा शायरीतून इशारा, ‘जो आज साहिबे मसनत है, कल नहीं होंगे, किरायेदार है…

“मै जानता हूँ कि दुश्मन भी कम नही, लेकिन हमारी तरह हथेली पे जान थोडी है, जो आज साहिबे मसनद है कल नही होंगे, किरायदार है जाती मकान थोडी है, सभी का खून है शामिल यहा की मिट्टी मे किसी के बाप का हिंदुस्तान थोडी है”राहत इंदौरी यांच्या या शायरीच्या माध्यमातून माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी केंद्र व राज्य सरकारला सत्ता व सरकार कायमचे कोणाचेच नसते व देशाच्या इतिहासात सर्वांचेच योगदान आहे, तो इतिहास कोणालाही पुसता येणार नाही, याची आपल्या हटके अंदाजात आठवण करून दिली.

यावेळी केंद्र व राज्य सरकार विरोधात धनंजय मुंडे यांनी तुफान फटकेबाजी करत, सुरत गुवाहाटी, गोवा मार्गे मुंबई या शिंदे सरकार स्थापनेपूर्वीच्या घटनाक्रमावरून सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. हे सरकार केवळ स्वार्थ आणि खोके यासाठीच स्थापन झाले असून याची जाणीव आता सर्वसामान्य माणसाला देखील झाली असल्याने, ते कोणालाच भावत नाहीये, असेही म्हणायला धनंजय मुंडे विसरले नाहीत.

दरम्यान राज्य सरकार आपापसात सगळे काही आलबेल आहे हे दाखवायची कसरत करत असताना राज्याची परिस्थिती मात्र हाताबाहेर जाताना दिसत आहे. अतिवृष्टी व परतीच्या पावसाने राज्यातील शेतकरी अक्षरश: कोलमडून पडला असून सरकारची शेतकऱ्यांना कसलीही मदत झाली नाही. राज्यातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करायला जर हे सरकार असमर्थ असेल, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याविरुद्ध रस्त्यावर उतरून संघर्ष करेल; असा इशाराही धनंजय मुंडे यांनी यावेळी बोलताना दिला.

वेदांता – फॉक्सकॉन पाठोपाठ एका मागून एक मोठमोठ्या गुंतवणुकीचे प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर अन्य राज्यांमध्ये जात असून ते रोखण्यासाठी राज्यसरकार काहीही करत नाही, हे स्पष्ट दिसत आहे; परंतु यामुळे लाखो युवकांना मिळणारे रोजगार मात्र एक प्रकारे हिरावूनच घेतले आहेत, हे स्पष्ट दिसून येते. त्यामुळे एकमेकांवर आरोप करत बसण्यापेक्षा राज्यसरकारने महाराष्ट्र बाहेर गेलेल्या प्रकल्पातून जेवढी रोजगार निर्मिती होणार होती, तेवढे रोजगार राज्यातील तरुणांना उपलब्ध करून देण्याचा ठराव आगामी अधिवेशनात करावा, अशी मागणीही करणार असल्याचे धनंजय मुंडे यावेळी बोलताना स्पष्ट केले.

खासदार शरद पवार हे देशाचे नेतृत्व करणारे व्यक्तिमत्व असून विविध राज्यांनी आपल्या राज्यातील नेतृत्वाला संपूर्ण पाठिंबा देऊन दिल्लीश्वराविरोधात लढण्यासाठी ताकद दिली आहे; याची ममतादीदींसारखे अनेक उदाहरणे आहेत. त्याचप्रमाणे आता सबंध महाराष्ट्र देखील पवारसाहेबांच्या पाठीमागे उभा राहावा, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात काम करण्याची गरज असल्याचेही धनंजय मुंडे म्हणाले.

‘राष्ट्रवादी मंथन वेध भविष्याचा’ या शिबिराचा दुसरा व शेवटचा दिवस असून सकाळच्या सत्रात खासदार सुनिल तटकरे, माजी मंत्री राजेश टोपे यांनी आरोग्याबाबत तर माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अल्पसंख्याक व गृहनिर्माण विभागाबाबत माहिती दिली तर ज्येष्ठ विचारवंत प्रा.हरी नरके यांनीही आपले विचार व्यक्त केले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण

मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *