मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील भाजप सरकारने रोजगार उपलब्ध करून देणार, उद्योग आणण्याच्या घोषणा दिल्या. मात्र दिलेल्या आश्वासनांची पूर्तता सरकारने दिलेल्या नसल्याच्या निदर्शनार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर सरकारविरोधात घोषणाबाजी करत भोपळा फोड आंदोलन केले. त्यामुळे प्रवेशद्वारावर असलेल्या पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली.
दरवर्षी बेरोजगारांना रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देणार, उद्योग मोठ्या प्रमाणावर आणणार असल्याच्या घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मात्र चार वर्षे झाली तरी राज्य सरकारने केलेल्या घोषणेची पूर्तता केली नसल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्ये राजूरकर यांनी व्यक्त केले.
त्यामुळेच राज्य सरकारच्या विरोधात भोपळा फोड आंदोलन केल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर कार्यकर्त्यांनी येवून घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. तसेच बंदोबस्तासाठी उपस्थित असलेल्या पोलिसांनी तातडीने आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेवून त्यांची रवानगी मरिन लाईन्स पोलिस ठाण्यात केली.