राज्यातील मराठा समाजातील पोरांना आरक्षण मिळावे यासाठी उद्यापासून गावागावातील मराठा समाजाने सामुहिक आमरण उपोषणाला सुरुवात करावी असे आवाहन मराठा आरक्षण कार्यकर्त्ये मनोज जरांगे पाटील यांनी करत या आमरण उपोषणा दरम्यान कोणाच्या जीवाला काही झाले तर त्याची जबाबदारी राज्य सरकारवर असणार आहे असा इशारा राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारला दिला.
जालना जिल्ह्यातील आंतरावली सराटी येथे मराठा आऱक्षणाच्या प्रश्नी पुन्हा एकदा राज्य सरकारच्या विरोधात आमरण उपोषण आंदोलन सुरु केले. आज मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा चवथा दिवस आहे. चवथ्या दिवशी उपोषणस्थळी बोलताना मनोज जरांगे पाटील हे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी वरील इशारा दिला.
यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले की, राज्य सरकारकडून आज संध्याकाळपर्यंत काय प्रतिसाद मिळतो याची वाट पाहणार आहोत. जर राज्य सरकारकडून कोणताच प्रतिसाद आला नाही तर उद्यापासून सामुहिक आमरण उपोषणाला गावागावातून सुरुवात करण्यात येणार आहे. त्यासाठी मोठ्या गावाच्या ठिकाणी त्या गावाच्या शेजारील गावातील सर्व मराठा समाजाने एकत्र जमून आमरण उपोषणाला सुरुवात करायची आहे. तसेच गावात राजकिय नेत्यांना येऊ देऊ नये असे आवाहनही मराठा समाजाला केले.
पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, राज्यातील कोणत्याही राजकिय पुढाऱ्याला आपल्या दारात येऊ देऊ नका आणि आपणही कोणाच्या दारात जाऊ नका असे आवाहन समाजाला करतानाच राज्यातील सामुहिक आमरण उपोषणाच्या दरम्यान मराठा समाजाच्या लेकराला काही झाले तर त्याची जबाबदारी राज्य सरकारवरच राहणार आहे, असा इशाराही राज्य सरकारला दिला.
मनोज जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणाले की, राज्यातील मराठा समाजाच्या पोरांच्या भविष्यासाठी हे आंदोलन करत आहे. पुढच्या काळात या पोरांचे शिक्षण, त्यांचे जीवन सुसह्य व्हावे यासाठी हे आंदोलन सुरु असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द खरा करून दाखवावा असे आवाहनही यावेळी केले.
यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी भाजपाकडून मी पुन्हा येईन हा देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडिओ पुन्हा एकदा ट्विट केल्याबाबत विचारले असता मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मी त्यात पडणार नाही. कोण परत येणार नाही हा ज्याचा त्याचा निर्णय आहे. तो राजकिय निर्णय आहे. त्याबाबत मी कधीही बोलणार नसल्याचे स्पष्ट केले.
तसेच मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आतापर्यंत मराठ्यांनी राजकिय नेत्यांसाठी लय लढले, त्यांना मोठं करण्यासाठी झटले. आता त्यांची वेळ आहे. मराठ्यांच्या पोरासाठी लढण्याची असं राजकिय पुढाऱ्यांना आवाहन करत या पुढाऱ्यांनीही गावागावात फिरण्यापेक्षा मुंबईत जावं आणि एका दिवसाचे अधिवेशन घेण्यासाठी सरकारवर दबाव आणून मराठ्यांना आरक्षण मिळवून द्यावं असे त्यासाठी सर्व आमदार आणि खासदारांनी मुंबईला जावं असं आवाहन केलं.
तसेच मनोज जरांगे पाटील शेवटी म्हणाले की, आता ही वेळ मराठ्याच्या पोरांसाठी लढण्याची आहे. जर तुम्ही मराठ्यांना आरक्षण दिलंत हाच मराठा समाज पुन्हा तुम्हाला मोठं केल्याशिवाय राहणार नाही असे सांगत सरकारला माझं पुन्हा सांगण आहे. आमचं आंदोलन पुन्हा तीव्र होणार आहे. ते आंदोलन जर तीव्र झालं तर ते तुम्हाला झेपणार ही नाही की परवडणार नाही असा गर्भित इशारा दिला.