कल्याण आणि दहिसर येथील गोळीबाराच्या घटनेनंतर राज्याचे मंत्री दादाजी भुसे आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यात विधानसभा सभागृाहाच्या लॉबीत धक्काबुक्की होत एकमेकांवर धावून जाण्याचा धक्कादायक प्रकार घडला. यावरून प्रसारमाध्यमात आणि राजकिय वर्तुळात विविध चर्चांना ऊत आला. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सदर प्रकरणाचा मुद्दा उपस्थित करत गँगवॉर सभागृहात आले असल्याने या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. त्यावर मंत्री दादाजी भूसे यांनी सभागृहाच्या बाहेर अशी कोणतीही घटना घडली नसल्याचा खुलासा केला. परंतु सभागृहाच्या बाहेक थोरवे यांनी मात्र दादाजी भुसे यांच्याबरोबर बाचाबाची झाल्याचे मान्य केले.
विधानसभेत जयंत पाटील यांनी मुद्दा उपस्थित केल्यानंतर मंत्री दादाजी भूसे यांनी खुलासा करताना म्हणाले की, महेंद्र थोरवे हे माझे वैयक्तिक मित्र आहेत. तसेच त्यांच्यात आणि माझ्यात कोणत्याही प्रकरचा वाद नाही. काही वेळापूर्वी एका प्रकल्पावरून आमच्यात चर्चा सुरु होती. त्या चर्चे दरम्यान फक्त थोडासा आवाज मोठा झाला. परंतु आम्ही दोघेही एकाच पक्षाचे असून आम्ही चांगले मित्र आहोत. आमच्यात कोणत्याही प्रकारचे वितुष्ठ नाही असा खुलासा केला.
त्यावर मध्येच एका आमदाराने दादा भुसे यांची नार्को टेस्ट करा, सीसीटीव्ही फुटेज चेक करा अशी मागणी केली. त्यावर सभागृहातच दादा भुसे यांनी आव्हाड साहेब आणि विधानसभा अध्यक्षांनी यासंदर्भात माझ्या वक्तव्यातील माहितीची चौकशी करायची असेल आणि त्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासयचे असतील तर तुम्ही खुशाल तपासा असे सांगत आपण चौकशीला तयार असल्याचे सांगितले.
दरम्यान कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्याशी काही प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी संपर्क साधला असता ते म्हणाले की, दादा भुसे यांच्यासोबत बाचाबाची झाली. दादा भुसे अॅरोगंट आहे. तो नेहमीच तशा पध्दतीने बोलतो. वास्तविक पाहता एमएसआरडीसीच्या एका कामाच्या संदर्भात दादाजी भुसे यांना सांगितले होते. मात्र यावेळी पालकमंत्री म्हणून दुसऱ्याच दोन कामांना मंजूरी दिली. त्याचा जाब मी पालकमंत्री म्हणून त्यांना विचारला. परंतु दादा भुसे यांनी अॅरोगंटली उत्तर दिल्याचे सांगितले.