मराठी ई-बातम्या टीम
राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून आणि आघाडीचा घटक पक्ष असूनही काँग्रेसचा वरचष्मा कधीच दिसू दिला जात नाही. त्यामुळे काँग्रेसकडून सातत्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. काँग्रेसकडूनही आतापर्यत या मुख्य प्रश्नावरून मागील दोन वर्षात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची जवळपास तीन वेळा भेट घेतली आहे. त्यातील एक भेट तर नुकतीच झाली.
यापार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विचारले असता ते म्हणाले की, राज्यातील सरकार हे अजित पवार यांचे नसून उद्धव ठाकरे यांचे असल्याची स्पष्टोक्ती देत त्यामुळे आमच्या ज्या मागण्या असतील त्या त्यांच्यासमोर मांडणं आमचं काम आहे, अशी प्रतिक्रिया दिली. अर्थमंत्री राष्ट्रवादीचा असल्याने तुमच्यावर अन्याय होतोय का, असा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी हे सरकार उद्धव ठाकरेंचं असल्याचं म्हटलं. ते राज्याचे प्रमुख आहेत, असेही ते म्हणाले.
रत्नागिरी येथे आयोजित ओबीसींच्या हल्लाबोल आंदोलनानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपावर निशाणा साधला. घोटाळे करण्याची मालिका कोणी सुरू केली असा सवाल करत नाना पटोले यांनी सध्याच्या आरोप-प्रत्यारोपांना उत्तर न देता बगल दिली.
भुंकणाऱ्या कुत्र्यांच्या तोंडी आपण लागत नाही, याचा अर्थ मी कुणाला कुत्रा म्हटलं असं होत नाही, असं स्पष्टीकरण देत त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर केली. किरीट सोमय्या यांनी गावात जाऊन आज पाहणी केली. त्यात यांना मुख्यमंत्र्यांची घर दिसली का, अशा चिमटा देखील काढत संजय राऊत यांच्या आरोपाचे समर्थन केले. संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली.
ठराविक टाईम बॉन्ड मध्ये ही चौकशी झाली पाहिजे, असे देखील नाना पटोले यांनी स्पष्ट केलं. गृहमंत्र्यांनी यामध्ये जातीने लक्ष घालावे, अशी मागणीही त्यांनी केली.
नाना पटोले यांच्या स्पष्टोक्तीमुळे महाविकास आघाडीत दोन सत्तास्थाने नसून एकच असल्याचे नाना पटोले अप्रत्यक्ष स्पष्ट करत राष्ट्रवादी काँग्रेसला आपण फारसे महत्व देत नसल्याचे त्यांनी एकप्रकारे बोलून दाखविले.