शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत शिवसेनेतील आमदार, नगरसेवकांनंतर आता खासदारही सोबत गेले. त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडल्याचे स्पष्ट झाले. मात्र यावेळी खासदार राहुल शेवाळे यांनी भाजपाबरोबरील युतीसाठी दस्तुरखुद्द शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे तयार असल्याचा गौप्यस्फोट केला. यापार्श्वभूमीवर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी खासदारांच्या बंडावर खोचक टीका केली.
मुंबईतील एका कार्यक्रमानंतर आदित्य ठाकरे हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, जे नेते आतापर्यंत सांगायचे की त्यांच्या मनात आमच्या बद्दल आदर आहे, ते सर्व खोटं होतं. आता त्यांचा मनातला राग आता दिसू लागला आहे. तसेच ही आता सर्कस सुरु असल्याची खोचक टीका केली.
तसेच १२ खासदार शिंदे गटात जाणार याची कल्पना होती. हे सर्व गद्दार असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
जे नेते आतापर्यंत सांगायचे की त्यांच्या मनात आमच्या बद्दल आदर आहे. ते सर्व खोटं होतं. आता त्यांचा मनातला राग आता दिसू लागला आहे. ही आता सर्कस सुरू आहे. उद्यापासून एक महत्त्वाची केस सुरू होत आहे. ही केस शिवसेनेसाठीच नव्हे तर देशासाठी महत्त्वाची असेल. या देशात लोकशाही आहे की नाही, याचा निकाल लागेल, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
खासदार राहुल शेवाळे यांनी केलेल्या युतीच्या दाव्याबाबतही आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. कोणी काय बोलायचं, हा ज्याचा त्याचा विषय आहे. त्यावर मी बोलणार नाही. एक एक बाण जात असले तरी, धनुष्य चालवण्यासाठी लागणारी ताकद आणि हिंमत ही फक्त ठाकरेंकडे आहे. माझे सर्व बंडखोरांना एवढेच आव्हान आहे की त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, निवडणूक लढावी, जिंकलात तर विजय तुमचा असे आव्हानही त्यांनी यावेळी बंडखोरांना दिले.