शिवसेना-ठाकरे गटाचे आमदार अनिब परब यांच्याशी संबंधित रत्नागिरीतील दापोली येथील साई रिसॉर्टवर हातोडा पडणार असल्याचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याकडून सातत्याने सांगितले जात होते. मात्र,सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे तूर्तास कथित साई रिसॉर्टचे पाडकाम होणार नसल्याचे सांगितले जात आहे. यावरून अनिल परब यांनी किरीट सोमय्या यांनी खुले आव्हान दिले.
याबाबत अधिक बोलताना अनिल परब यांनी सांगितले की, साई रिसॉर्ट माझ्या मालकीचे नाही. न्यायालयाने या प्रकरणात ‘जैसे थे’चे आदेश दिलेले आहेत, असे अनिल परब म्हणाले. यावेळी त्यांनी किरीट सोमय्या यांनी केलेले सर्व दावे फेटाळून लावले.
दापोली येथील साई रिसॉर्टच्या खरेदी विक्री व्यवहारात गैरव्यवहार झाल्याचा आरोप, अनिल परब यांनी चार वर्षांपूर्वी जुलै २०१८मध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकांसाठी दाखल केलेल्या शपथपत्रामध्ये या रिसॉर्टचा उल्लेख, त्यासाठी वीजजोडणी केलेला अर्ज,तसेच, या रिसॉर्टसाठी आकारण्यात आलेली घरपट्टीही परब यांनी भरली होती, असे अनेक दावे किरीट सोमय्यांनी केले आहेत. या प्रकरणात परब यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. मात्र, रिसॉर्टशी आपला काहीही संबंध नसल्याचा दावा अनिल परब यांनी केला.
महाविकास आघाडी सरकारची प्रतिमा खराब करणे,माझी बदनामी करून माझ्यावर मुद्दामहून आरोप केले. साई रिसॉर्टच्या बाजूला आणखी एक रिसॉर्ट आहे. तो माणूस गरीब आहे. त्याचा तर काहीही संबंध नाही. साई रिसॉर्ट बांधण्यास सरकारनेच परवानगी दिली होती. सरकारने दिलेली परवानगी चुकीची असेल तर त्यात मालकाचा दोष किती आहे, हे तपासावे लागेल, असेही ते म्हणाले.
भारतील जनता पक्षात काँग्रेस किंवा इतर पक्षातून जे गेलेत त्यांच्यावर आरोप आहेत. त्यांच्यावर कारवाई होत नाही. नारायण राणे काँग्रेस मधून भाजपात गेले.त्यांच्यावर कारवाई नाही, त्यांच्या अनधिकृत घरावरही कारवाई आता केली. मात्र सोमय्या हातोडा घेऊन गेले नाहीत. महाविकास आघाडीत असताना शिवसेनेतील नेत्यांवर आरोप केले पण ज्यांनी शिंदे गटात प्रवेश केला, त्यांच्या बाबत सोमय्या एकही शब्द बोलायला तयार नाहीत. त्यांच्या विरोधात बोलायची हिंमत सोमय्या का दाखवत नाहीत? असा सवाल करत सोमय्यांनी शिंदे गटात गेलेल्या नेत्यां विरोधात बोलून दाखवावे, असे आव्हान अनिल परब यांनी सोमय्यांना दिले.