केंद्रात भाजपाचे तर राज्यात भाजपाप्रणित शिंदे-फडणवीस सरकार असतानाही भाजपा-शिंदे गटाने सकल हिंदू समाजाच्या नावाखाली हिंदू जनआक्रोश मोर्चा आज रविवारी मुंबईत काढला. या मोर्चावरून टीका टीपण्णी सुरु असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपा-शिंदे गटावर निशाणा साधताना म्हणाले, लव्ह जिहादच्या नावाखाली जाती-समाजात तेढ निर्माण करण्याचा आणि जाती-जातीत विष पेरण्याचे काम सध्या सुरु झाले आहे. पण सर्व जाती-समाजांना एकत्र आणत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारलं असे सांगत निशाणा साधला.
कासेगाव येथे उभारण्यात येत असलेल्या क्रांती वीरांगणा इंदूमती पाटणकर यांच्या स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन व दुसर्या टप्प्याचा शुभारंभ विरोधी पक्ष नेते आ. पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, आ. मानसिंगराव नाईक उपस्थित होते. प्रारंभी भारत पाटणकर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, राजकीय पोळी भाजण्यासाठी जाती जातीत तेढ निर्माण केली जात आहे. मात्र आज जे समाजात सुरू आहे, त्याच्या विरोधात ज्या प्रमाणात उठाव व्हायला पाहिजे होता तसा तो होताना दिसत नाही अशी खंतही व्यक्त केली.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, लव्ह जिहादच्या नावा खाली समाजात विष पेरण्याच काम सुरू आहे. विविध जाती-समाजाना एकत्र घेउन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारले, आता देशाच्या प्रगतीसाठी याच विचाराने चालणे गरजेचे आहे. क्रांती वीरांगणा इंदूमती पाटणकर यांनी स्वातंत्रलढ्या बरोबरच जाती अंताचा लढा उभा केला, त्याकाळी त्यांनी अनेक आंतरजातीय विवाह लावून दिले होते. अलीकडे सेक्युलर या शब्दालाच कुठेतरी तिलांजली देण्याचा प्रयत्न काही जण करतात. हे आपल्या भारताच्या दृष्टीने अतिशय अडचणीचे होणार आहे अशी भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यानंतर माध्यमांशी बोलताना पवार यांनी पहाटेच्या शपथविधी पेक्षा महागाई, बेरोजगारी यासारख्या गंभीर प्रश्नावर जास्त लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचे सांगत पोटनिवडणुकीमध्ये कोण विजयी होईल हे सांगायला मी ज्योतिषी नसल्याचे सांगून राजकीय भाष्य करण्याचे टाळले.
कासेगाव येथील क्रांतीवीरांगणा इंदुमती पाटणकर यांच्या स्मारकासाठी दोन विधानपरिषद सदस्यांच्या निधीतून एकूण २२ लाख आणि सीएसआर मधून पाच लाखाचा निधी देण्याचे अजित पवार यांनी जाहीर केले. तसेच प्रबोधन संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त काढण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. शेवटी आनंदराव पाटील यांनी आभार मानले.