नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या पाच जागांसाठी निवडणूक झाली. मात्र या निवडणूकीतील इतर उमेदवारांच्या चर्चेपेक्षा सर्वाधिक चर्चा नाशिक पदवीधर मतदारसंघातील काँग्रेसचे बंडखोर आणि अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांची झाली. तांबे यांच्या बंडखोरीबाबत अजित पवार यांनी बाळासाहेब थोरात यांचे नाव घेत केलेले वक्तव्य, त्यानंतर नाना पटोले यांचे वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी पहिल्यांदाच भाष्य केले.
संगमनेरमध्ये आयोजित एका कार्यक्रमा दरम्यान त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे नागरिकांशी संवाद साधताना म्हणाले, विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी मोठं राजकारण झालं. सत्यजीत या निवडणूकीत चांगल्या मतांनी विजयी झाले. मी त्यांचं अभिनंदन करतो. मात्र, जे राजकारण झालं, ते व्यतीत करणारं होतं. मी याबाबत माझी भूमिका पक्षश्रेष्ठींकडे मांडली आहे. हे पक्षीय राजकारण आहे. त्यामुळे यावर बाहेर बोललं पाहिजे, या मताचा मी नाही. याबाबत पक्षातील नेत्यांबाबत बोलणं झालं असून योग्य तो निर्णय होईल, असे स्पष्ट केले. .
यावेळी पुढे बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले, तसेच गेल्या काही दिवसांत काही लोकांना आपल्याबद्दल गैरसमज पसवण्याचं काम केलं. मात्र, काँग्रेसचा विचार हा आपला विचार आहे आणि आपली पुढची वाटचालही याच विचाराने होणार आहे, असल्याचेही स्पष्ट केले.
महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर मोठ्या प्रमाणात राजकारण होतं आहे. अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांना त्रास दिला जात आहे, त्यांना अडचणी आणलं जात आहे, त्यांचे उद्योग बंद पाडण्यासाठी अनेकांकडून प्रयत्न सुरू आहे. मात्र, आपण अनेकदा संघर्ष केला आहे. संघर्षातूनच आपण मोठं झालो आहे. त्यामुळे या संघर्षातून आपण नक्कीच बाहेर येऊ, असा मला विश्वास आहे, असेही ते म्हणाले.
नागपूर अधिवेशनावेळी मी सकाळी फिरायला गेलो होतो. यावेळी चालताना माझा तोल गेला आणि मी पडलो. त्यामुळे खांद्याला दुखापत झाली. ब्रीच कँडी या रुग्णालयात माझ्यावर उपचार झाले. डॉक्टरांनी मला एक महिना प्रवास करण्यास मनाई केली म्हणून मी कार्यक्रमाला येऊ शकलो नाही, अशी महितीही त्यांनी दिली.