पत्रावाला चाळप्रकरणी ईडीने शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांच्या विरोधात ईडीने कारवाई करत अटक केली. तसेच त्यांना विशेष न्यायालयानेही दुसऱ्यांदा ईडी कोठडी सुनावली. त्यानंतर आज ईडी कोठडीतूनच संजय राऊत यांनी काँग्रेसचे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खर्गे यांना पत्र लिहिल्याची माहिती पुढे आली आहे.
या पत्रात ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊत यांनी काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांना पत्र लिहीत काँग्रेस आणि सहयोगी मित्र पक्षांनी दाखविलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानले आहेत.
ईडी कारवाईनंतर काँग्रेस आणि सहयोगी पक्षांनी संजय राऊत यांना पाठिंबा दर्शवला होता. कृती आणि विचारामधून पाठिंबा दिल्यामुळे मी मित्रपक्षांचे आभार मानतो, असं संजय राऊतांनी पत्रात लिहिले आहे. काँग्रेस खासदार मल्लिकार्जून खर्गे यांना राऊतांनी पत्र लिहिलं आहे. रडायचं नाही लढायचं अशी बाळासाहेब ठाकरेंची नेहमीच शिकवण राहिली आहे. ही शिकवण घेऊन आम्ही सध्या काम करत आहोत. माझ्यावर जी ईडीची कारवाई झाली त्यावेळेस सगळ्याच मित्रपक्षांनी मला पाठिंबा दिला. विशेष: काँग्रेस नेते राहुल गांधींनी ट्वीट करत या कारवाईचा निषेध केला होता. यापुढेही आपल्यावर अशा प्रकारच्या कारवाई होत राहतील आणि आपल्यावर दबाब येत राहील. मात्र, आपण न घाबरता लढत राहिलं पाहिजे, असे राऊतांनी पत्रात लिहिले आहे.
राजकीय सूडबुद्धीतून माझ्यावर कारवाई केली असल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. मात्र, दिवगंत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माझे कुटुंबीय, हितचिंतक यांच्या पाठिंब्यावर या कठीण काळातून लवकरच बाहेर पडू, असा विश्वासही त्यांनी पत्राद्वारे व्यक्त केला.
ईडी कोठडीत असलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही सक्तवसुली संचालनालयाने अर्थात ईडीने चौकशीसाठी समन्स पाठवलं आहे. गोरेगावमधील पत्राचाळ घोटाळा प्रकरणी हे समन्स बजावण्यात आलं आहे. ईडीने वर्षा राऊत यांच्या बँक खात्यातून अनेक आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप ईडीने केला.
संजय राऊत यांनी पाठविलेले हेच ते पत्रः