मुंबई : प्रतिनिधी
धुळे शहर महानगरपालिकेत १९८९ साली मागासर्गीयांची भरतीची सीआयडी मार्फत चौकशी करण्याच्या मागणीसाठी धुळे जिल्ह्यातील रहिवासी बबन यशवंत झोटे या व्यक्तीने मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर स्वत:वर रॉकेल ओतून घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच हालचाल करून झोटे यास आत्महत्येपासून परावृत्त केले.
महानगरपालिकेत सरळसेवा भरतीच्या माध्यमातून मागासवर्गीयांची झालेल्या नोकर भरतीत मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप झोटे यांनी करत याप्रकरणात १ महिन्यात या प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करण्याची मागणी केली होती. चौकशी न केल्यास आत्महत्या करणार असल्याचा इशारा ३ एप्रिल २०१८ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात दिला होता. मात्र याप्रकरणी राज्य सरकारकडून कोणतीच कारवाई झालेली नसल्याने त्याने हा प्रयत्न केला असल्याचे सांगण्यात येत आहे.
या भरतीच्यावेळी रितसर मुलाखती घेण्यात आल्या. मात्र मुलाखती घेतलेल्यांपैकी नगराध्यक्ष, नगरसेवक यांच्याच सग्यासोयऱ्यांची भरती करण्यात आल्याचा आरोप करत ही बोगस भरती करण्यात आल्याचा दावाही त्याने केला.
याप्रकरणी न्यायालयात दावा दाखल केला असता न्यायालयानेही आमच्या बाजूने निकाल दिला. मात्र त्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर मात्र त्यास स्थगिती देण्यात आली. त्यामुळे याप्रकरणाचीच सीआयडी मार्फत चौकशी करण्याची मागणी झोटे यांने केली होती.