Breaking News

पाच वर्षातल्या ६० लाख रोजगारांची यादी जाहीर करा ६० लाख रोजगार निर्मितीचा दावा खोटा व फसवा असल्याचा काँग्रेसचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी
राज्यात पाच वर्षात ६० लाख रोजगार निर्मिती केल्याचा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा दावा धादांत खोटा, हास्यास्पद तसेच बेरोजगार तरुणांची फसवणूक करणारा आहे. ६० लाख रोजगार कोणत्या-कोणत्या जिल्ह्यात दिले आणि कोणत्या कंपनीत याची नावासह यादी जाहीर करा, असे थेट आव्हान विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिले आहे.
भाजप-शिवसेना सरकार नियोजनशून्य, दिशाहिन धोरणांमुळेच पाच वर्षांत गुंतवणूक व रोजगार निर्मितीमध्ये सपशेल अपयशी ठरले असून विधानसभा निवडणुकीत तरुणवर्गाच्या नाराजीचा फटका बसू नये म्हणून ही फसवी व दिशाभूल करणारी आकडेवारी देण्याचा आटापीटा करत आहे. मतांच्या लाचारीसाठी तरुणवर्गाच्या भावनेशी खेळण्याचा हा प्रकार आहे. प्रत्यक्षात नोकरी मिळत नाही म्हणून गावा-गावात बेरोजगारांच्या फौजा असल्याचे चित्र आहे. औरंगाबाद, नाशिक, पुणे या औद्योगिक भागातील नामांकित वाहन उद्योगातून उत्पादन बंद करुन कामगार कपात केली आहे. या कंपन्यांशी निगडीत असलेले शेकडो छोटे उद्योगही बंद करावे लागले असल्याने लाखो कामगार बेरोजगार झाल्याचे त्यांनी सांगितले.
मेक इन महाराष्ट्र, मॅग्नेटिक महाराष्ट्र संकल्पना अपयशी ठरल्या असून लाखो रोजगार देण्याचे सरकारी दावे हवेतच विरले आहेत. मग हे रोजगार दिले तर कुठे, सगळीकडे कामगार कपात होत असताना उद्योगमंत्री कशाच्या आधारावर ६० लाख रोजगार निर्मितीचा दावा करत आहेत? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
राज्य सरकारच्या ३२ हजार जागांसाठी तब्बल ३२ लाख इच्छुकांनी अर्ज केले होते. तर मागच्या वर्षी मंत्रालयातील कँटीनमध्ये वेटरच्या १३ जागांसाठी ७ हजार अर्ज आले होते. या घटना रोजगार निर्मितीची राज्यातील दुर्दशा दाखवते. राज्यात सध्या ४५ लाख बेरोजगार असल्याचे सरकारी आकडेवारीच सांगते आहे. ही संख्या नोंदणी केलेली आहे, प्रत्यक्षात बेरोजगारांचा आकडा याहून कैकपटीने मोठा आहे. दुसरीकडे नोकरी नसल्याने पदवीधर, उच्चशिक्षित तरुणही चतुर्थश्रेणी पदाकरता अर्ज करत आहेत. पाच वर्ष शिक्षक भरती रखडवली. अशी भीषण स्थिती असताना उद्योगमंत्र्यांनी ६० लाख रोजगार निर्मिती झाल्याचा दावा करणे म्हणजे राज्यातील बेरोजगारी संपली असेच म्हणावे लागेल, असा टोलाही त्यांनी लगावला.
नोटाबंदी,जीएसटीमुळे आर्थिक क्षेत्रात प्रचंड मगरळ आलेली आहे. त्याचा परिणाम राज्यातील उद्योग क्षेत्रावर झालेला स्पष्ट दिसत आहे. वाहन उद्योग, वस्त्रोद्योग क्षेत्रातील कामगार कपातीनंतर बिस्किट बनवणाऱ्या पारले-जी कंपनीलाही १० हजार कामगारांची कपात करावी लागली आहे. आयटी क्षेत्रातही कर्मचारी कपात केली जात आहे. असंघटीत क्षेत्रातील कामगारांची स्थिती तर यापेक्षा भीषण आहे, असे असताना ६० लाख रोजगार निर्मिती केली असा धादांत खोटा दावा करुन नोकरीची आशा लावून बसलेल्या राज्यातील तरुणवर्गाच्या जखमेवर देसाई यांनी मीठ चोळल्याचा आरोपही त्यांनी केला.

Check Also

विजय वडेट्टीवार यांचा सवाल, सत्तापिपासून भाजपा मृतदेहावरून रॅली काढतंय काय?

मुंबईमध्ये होर्डींग दुर्घटना घडली आहे. भ्रष्ट महायुतीमुळे या दुर्घटनेत १८ जणांना जीव गमवावा लागला आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *