मुंबई : प्रतिनिधी
कधी काळी सभेला गर्दी जमविण्यासाठी कॉंग्रेसच्या नेत्यांनी नागरीकांना पैसे दिल्याचा आरोप करणाऱ्या भाजपकडून आता भाजपाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित महामेळाव्यासाठीही भाजपाने कार्यकर्त्यांना पैसे वाटप केल्याचे उघडकीस येत आहे. मुंबईत पोहोचलेले कार्यकर्त्ये सभेच्या ठिकाणी जायच्या ऐवजी मौज मजा करण्यासाठी मुंबई पर्यटनासाठी जात असून आणखी पैसे दिले असते तर दिवसभराची चांगली सोय झाली असती अशी मतेही या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहेत.
भाजपाच्या स्थापना दिवसाचा सोहळा साजरा करण्यासाठी भाजपकडून राज्यभरातून कार्यकर्त्यांना मुंबईत येण्यासाठी जवळपास प्रत्येक जिल्ह्यातून रेल्वे व्यवस्था करण्यात आली. त्याचबरोबर तब्बल ५० हजार खाजगी वाहनांची व्यवस्थाही करण्यात आली आहे. या वाहनांनी मुंबईत येण्यासाठी कार्यकर्त्यांना पेट्रोल, डिझेल आणि खाण्या-पिण्यासाठी भाजपकडून पैसे दिल्याचे बीडवरून आलेल्या एका कार्यकर्त्याने सांगितले.
मात्र खाजगी वाहनाने येताना खाण्या-पिण्यावर पैसे जास्त खर्च होतात. याचा अंदाज कदाचीत पक्षाच्या नेत्यांना नसल्याने कमी पैसेत आलोय. खरे मात्र आता जाताना पैशाची अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. सोबत ४० ते ५० कार्यकर्त्ये असल्याने त्यांच्या खर्चाची जबाबदारीही आता आमच्यावर असल्याचे सांगत आणखी पैसे दिले असते तर या सर्वांसाठी व्यवस्थित खर्च करता आला असता असे मतही त्यांनी व्यक्त केले.
कधी काळी विरोधी असलेला भाजपा आता सत्तेत असल्याने पक्षाकडून मोठ्या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.