२०१४ पर्यंत आपल्याला भाजपासोबत जायचं आहे. हे यांच्या गावीही नव्हतं. का तर तो पर्यंत ते सत्तेत होते. त्यानंतर मात्र त्यांना भाजपासोबत जायचं असल्याची आठवण झाली. त्यानंतर जो काही शपथविधी झाला, तसेच माघारी बोलावणं झालं. बर त्यानंतर पुन्हा भाजपासोबत जायच असल्याचं वरिष्ठांनी सांगितलं. त्या बैठकीला जयंत पाटील, अनिल देशमुख यांच्यासह सर्वजण होते. त्यावेळी वरिष्ठांनी मला सांगितलं की मी राजीनामा देतो आणि त्यानंतर तुम्ही सरकारमध्ये जा. त्यानुसार राजीनाम्याचं देत असल्याचं जाहीर केलं. अन घरी जाताच राजीनामा परत घ्या म्हणून आंदोलन करायला माणसं यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण समोर माणसं बसविली. जर तुम्हाला राजीनामा द्यायचाच होता तर, राजीनाम्याचे नाटक कशासाठी, त्यानंतर मला गाफील ठेवत जितेंद्र आव्हाड आणि परांजपे यांना घरी बोलावून कशाला सांगायचं असा सवाल करत मी वरिष्ठांच्या त्या गोष्टीला फसवणूक म्हणणार नाही. पण मला सतत गाफील ठेवत असा आरोप अजित पवार यांना पक्षाचे संस्थापक आणि शरद पवार यांच्यावर केला.
कर्जत येथे अजित पवार गटाच्यावतीने आयोजित दोन दिवसीय मंथन शिबीराचा समारोप करताना गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार बोलत होते. त्यावेळी त्यांनी वरील आरोप केला.
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, इथे सगळे उपस्थित असलेल्या सगळ्या जणांना आणि आमदार मंत्री या सगळ्यांना माहित आहे. वरिष्ठ आधी एक सांगत आणि नंतर भलतंच करत असतं. माझ्या देवगिरी या शासकिय बंगल्यातील ह़ॉलमध्ये भाजपा सरकारसोबत जाण्याआधी सर्व आमदार आणि नेत्यांची बैठक झाली. त्या बैठकीला जयंत पाटील, प्रफुल पटेल, सुनिल तटकरे, छगन भुजबळ, अनिल पाटील आदी सगळे उपस्थित होते. त्या बैठकीत सरकारसोबत जाण्याचा आमचा निर्णय झाला. याची माहिती साहेबांना एकदम कशी द्यायची म्हणून आम्ही आधी सुप्रिया सुळेला बोलावलं. तीला यातलं काहीच माहित नव्हतं. आम्ही आमचा झालेला निर्णय सांगितला. तेव्हा सुप्रियाने सांगितले की, मी साहेबांना कनव्हिन्स करते. एक सात आठ दिवस द्या. त्यानंतर वेळ जात होता. पण त्यानंतर आम्ही निर्णय घेतला आणि सरकारमध्ये सहभागी झालो असल्याची माहिती दिली.
अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, पुन्हा वरिष्ठांचा निरोप आला पहिल्यांदा मंत्री घेऊन या, त्यानंतर मंत्री आणि आमदार यांना घेऊन या. त्यानुसार आम्ही दोन्ही वेळा सर्वांसोबत वरिष्ठांच्या आदेशानुसार यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे येथे भेटीसाठी गेल्याचे स्पष्ट केले.
अजित पवार म्हणाले की, आमचे पक्षाचे वरिष्ठ दोन वेळा काँग्रेसमध्ये गेले दोन वेळा बाहेर पडले. आम्हीही त्यांच्यासोबतच राहीलो. पण त्यांना कधी विचारले नाही. आम्हीही फुले-शाहू- आंबेडकर यांचा विचारांचा वारसा घेऊन पुढे निघालो आहोत. मात्र २०१९ मध्ये त्यांनी शिवसेनेसोबत युती केली. मग आम्ही भाजपासोबत गेलो तर काय फरक पडला असा सवालही केला.
२००४ साली वरिष्ठांनी भाजपासोबत जाऊन सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता हे ही मला प्रफुल पटेल यांच्याकडूनच समजले असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी करत प्रफुल पटेल यांच्याकडे अशा अनेक घटनांचे भांडार आहे. पण ते हळहळू काढणार असल्याचे त्यांनी मला सांगितले. अशा पध्दतीने सतत मला गाफील ठेवण्यात येत होते असा पुनःरूच्चारही अजित पवार यांच्यावर केला.
अजित पवार पुढे बोलताना म्हणाले, भाजपाच्या होकारानंतर आम्ही पहिली संभावित मंत्र्यांची यादी तयार करायला बसलो त्यापर्यंत अनिल देशमुख आमच्यासोबत होते. भाजपाच्या वरिष्ठांना आम्ही यादी कळविल्यानंतर त्यांच्याकडून निरोप आला की अनिल देशमुख यांचा समावेश मंत्रिमंडळात करता येणार नाही. त्यांच्या समावेशाने लोक आम्हाला प्रश्न विचारतील ती बाब अनिल देशमुख यांना कळविल्यानंतर मंत्रिपद नाही तर मी तुमच्यासोबत नाही असे सांगितले. त्यामुळे आज ते तिकडे जाऊन आमच्यावर टीका करत असल्याचा दावा केला.
शेवटी अजित पवार म्हणाले की, आपला पक्ष काही निवडणूक कालावधी पुरता भाजपासोबत गेला नाही. तर पुढेही आपला पक्ष वेगळाच राहणार आहे. तसेच आगामी १०० दिवसानंतर किंवा १२० दिवसानंतर मार्च महिन्यात निवडणूकांची आचारसंहिता लागणार आहे. त्यामुळे पक्षवाढीसाठी आपल्याकडे तसा कमी वेळ राहिला आहे. त्यामुळे मंचावर बसलेल्या नेत्यांनी आणि मंत्र्यांनी मुंबईतील पक्ष कार्यालयात रोज बसून न राहता राज्यातील जनतेत दिसले पाहिजे अन्यथा तुमच्या जबाबदाऱ्या दुसऱ्याच्या गळ्यात जाईल अर्थात सह्यांचे अधिकार दुसऱ्याकडे जातील असा निर्वाणीला इशारा स्वपक्षियांना दिला.
तसेच मंत्रालयातील कार्यालयात मंत्री आमदार यांना प्राधान्य आहे. आता तिसरा प्राधान्य आपल्या पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनाही देण्यात येत असल्याचेही अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.