भाजपाचे ड्रग्ज पेडलर आणि बनावट नोटा रॅकेटशी असलेल्या संबधाचा पर्दाफाश करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना दुपारी ईडीने अटक केली. त्यानंतर तातडीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची शरद पवारांच्या उपस्थितीत आणि मविआ नेत्यांची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीत नवाब मलिक दोषी आढळल्याशिवाय त्यांचा राजीनामा घ्यायचा नाही असा या दोन्ही बैठकीत निर्णय घेण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
मलिकांच्या अटकेनंतर शरद पवारांचे निवास्थान असलेल्या सिल्व्हर ओक येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह काँग्रेसचे नेतेही उपस्थित होते.
आजच्या मलिकांवरील कारवाईनंतर महाविकास आघाडी आक्रमक भूमिका घेणार आहे. महाविकास आघाडीचे मंत्री आणि नेत्यांकडून भाजपविरोधात आंदोलन पुकारण्यात आलंय. ‘आता आम्ही सर्वजण बसलो होतो. आमी सर्वजण एकत्रितपणे कायदेशीररित्या जनतेत जाऊन मुकाबला करु. उद्या सकाळी १० वाजता मंत्रालयाशेजारील महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ आम्ही मंत्री निषेध म्हणून धरणं धरणार आहोत. तसेच परवापासून राज्यातील सर्व तालुका, जिल्हा, शहर पातळीवर शांतपणे मोर्चा आंदोलन, धरणे आम्ही करु’ असा इशारा त्यांनी दिला.
मलिकांच्या राजीनाम्याबाबत विचारले असता भुजबळ म्हणाले की, ‘राजीनामा देण्याचा प्रश्न उपस्थित होत नाही. त्यांच्यावर गुन्हा अद्याप सिद्ध झालेला नाही. नारायण राणेंनाही अटक झाली होती, मग त्यांना राजीनामा मागितला गेला होता का? ते दोषी आहेत म्हणून न्यायदेवतेसमोर सिद्ध होत नाही तोवर राजीनाम्याचा प्रश्न नाही. आमच्या दृष्टीने त्यांनी चूक केलेली नाही. दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत राजीनाम्याची शिक्षा आम्ही तरी त्यांना देणार नाही. अनिल देशमुख, राठोड यांच्याबाबत जे झालं ते आता होणार नाही. राजीनाम्याचा आसूरी आनंद आम्ही भाजपला होऊ देणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे की आज पहाटे आमचे सहकारी नवाब मलिक यांच्या घरी ईडीचे लोक गेले. काही तपास केला आणि नंतर त्यांना घेऊन ते ईडी कार्यालयात गेले. त्यानंतर जी काही चौकशी करुन कोर्टात त्यांना उभे केले. आपल्याला कल्पना आहे की त्यावर युक्तीवाद झाला. एकूण काय तर १९९२ सालचा एफआयआर, त्यावेळची घटना, १९९९ साली त्या जागेचं अॅग्रीमेंट आणि त्यानंतर १२ वर्षांनी पीएमएलएचा जन्म झाला. या तीस वर्षात नवाब मलिक यांचे नाव कुणीही कुठेही घेतले नाही. पण आता मलिक हे सातत्याने भाजपा विरोधात बोलतात किंवा जांच्यावर अन्याय होतो त्याबाबत ते निडरपणे बोलतात. तर त्यांचे तोंड बंद करण्यासाठी हा सर्व प्रकार असल्याचा आरोप त्यांनी केला.