हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूकीची घोषणा झाल्यानंतर भाजपा आणि आम आदमी पार्टीकडून मोठमोठ्या घोषणा करत निवडणूक विजयाचे दावे करण्यात आले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर भाजपाला मतदान म्हणजे मला मतदान असे आवाहन मतदारांना केले. तसेच डबल इंजिन सरकारमुळे हिमाचल प्रदेशच्या विकासामुळे हातभार लागेल असे आश्वासनही दिले. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाला नाकारत काँग्रेसच्या बाजूने कौल दिला. त्यामुळे काँग्रेसला ४० जागांवर विजय मिळाला असून ७ ठिकाणी आघाडीवर आहे. तर भाजपाला १८ ठिकाणी विजय मिळवला असून ८ ठिकाणीवर आघाडीवर असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळा आकडेवारी देण्यात आली आहे.
हिमाचल प्रदेश हा भाजपामध्ये मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाल्याने भाजपाच्या विजयावर परिणाम होईल असे बोलले जात होते. तसेच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा हे याच राज्यातून आलेले असल्याने जे.पी.नड्डा यांनी विधानसभा निवडणूकीत हिमाचल प्रदेशात ठाणच मांडले होते. तरीही नड्डा यांना बंडखोरांना रोखता आले नाही. त्यामुळे अखेर अनेक बंडखोरांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः बंडखोरांशी फोनवरून बोलून अर्ज मागे घेण्याची विनंती केली. परंतु अनेक बंडखोरांनी मोदींच्या विनंतीलाही भीक घातली नाही.
विशेष म्हणजे काँग्रेसकडून हिमाचल प्रदेशात प्रचारासाठी प्रियंका गांधी आणि मल्लिकार्जून खर्गे यांच्यासह काही अन्य नेत्यांच्या सभा झाल्या. मात्र भारत जोडो यात्रेमुळे राहुल गांधी हे हिमाचल प्रदेशात फिरकलेही नाहीत.
दरम्यान, १९५८ सालापासून हिमाचल प्रदेशात एकाच पक्षाला सत्ता स्थापनेची हॅटट्रिक दिली जात नाही. त्यानुसार गतवेळी हिमाचलच्या जनतेने भाजपाच्या पारड्यात मत टाकले. तर यंदा पुन्हा काँग्रेसच्या बाजूने कौल दिला.
दुपार पर्यंत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिर झालेल्या पक्षनिहाय आकडेवारीनुसार काँग्रेसने ४० जागांवर विजय मिळविला आहे. तर आम आदमी पार्टीने जोरदार प्रचारार्थ सुरुवात केली. मात्र आम आदमी पक्षाला आपले खातेही उघडता आले नाही.