ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठा समाजाला अतिरीक्त आरक्षण द्यायला पाहिजे. केंद्र सरकारने १० टक्के मराठा समाजाला अर्थिक मागास प्रवर्ग म्हणून आरक्षण देताना ५० टक्के अट ओलांडली आहे. तर मग मराठा समाजाला अतिरीक्त आरक्षण देण्यात काय अडचण आहे. असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
पुणे काँग्रेस भवन येथे चव्हाण माध्यमांशी बोलत होते. यावेळी प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी आमदार मोहन जोशी, दीप्ती चवधरी, रमेश बागवे, बाळासाहेब शिवरकर, गोपाळ तिवारी, विठ्ठलराव गायकवाड आदी नेते उपस्थित होते.यावेळी चव्हाण म्हणाले, शिंदे-फडणवीस-पवार सरकार मराठा आरक्षणाबाबत टोलवाटोलवी करीत समित्यांचे गुऱ्हाळ घालत बसू नये. त्यांनी ठोस भूमिका घ्यावी.अतिरिक्त आरक्षण देण्याचा निर्णय घेतला तर आमचाही त्याला पाठिंबा राहील असे चव्हाण म्हणाले.जालना येथील आंदोलकांवर लाठीचार्जचे आदेश कोणी दिले? याची चौकशी होईपर्यंत गृहमंत्र्यांना पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही असेही चव्हाण म्हणाले.
इंडिया आघाडीमुळे मोदी सरकार आणि भाजपमध्ये अस्थिरता निर्माण झाली असून सरकारकडून बोलविण्यात आलेल्या अधिवेशनातील विषयाबाबत ज्याप्रकारे गुप्तता बाळगण्यात येत आहे त्यावरून देशात बेसावधपणे निवडणूका घेण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी शंका त्यांनी यावेळी उपस्थित केली.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांना देशात स्थापन झालेल्या इंडिया आघाडीमध्ये यायचे असेल तर त्यांचे स्वागत आहे. मात्र, याबाबत काँग्रेस पक्ष याबाहत एकटा निर्णय घेऊ शकत नाही. इंडिया आघाडीची समन्वय समिती याबाबत निर्णय घेईल.असेही त्यांनी यावेळी सांगितले.