मध्यंतरी आपल्या पक्षातील काही जणांनी वेगळा विचार करून वेगळा निर्णय घेतला. तसेच त्यांनी त्यांचा अध्यक्ष निवडल्याचेही वर्तमान पत्रात वाचलं. पण तुम्ही निवडलेला अध्यक्ष तुरुंगात गेला हे मला माहित आहे. पण त्यांनी निवडलेला अध्यक्ष तुरुंगात गेला की नाही मला माहित नाही असा टोला अजित पवार आणि गटाचे नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे अधयक्ष शरद पवार यांनी लगावत त्यांनी आपल्याला विरोधात दोन ठिकाणी दावा केला असून त्या दोन्ही ठिकाणी तुम्हा सगळ्याची राष्ट्रवादीचं म्हणणं योग्य आहे असं सांगणारे वाक्य लवकरचं ऐकायला मिळेल असा दावा केला.
रेखा जाधव यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश आणि आगामी मुंबई महापालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर व तसेच अजित पवार गटाने बाहेर पडल्यानंतर शरद पवार यांनी पहिल्यांदाच मुंबईत जाहिर सभा घेतली. विशेष म्हणजे ही जाहिर सभा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश मुख्यालय असलेल्या बॅलार्ड पिअर्स परिसरात झाली. या सभेला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक मान्यवर नेते तसेच मुंबईतील २२४ वार्डाचे अध्यक्ष आणि असंख्य कार्यकर्त्ये यावेळी उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा तुम्हा सर्वांचा आहे. कारण आपण एका विचाराने आणि सर्वसामान्यांसाठी काम करत आलो आहोत. त्यामुळे हा पक्ष तुमचा सर्वांचा आहे. सध्या आपल्या विचारापासून वेगळा विचार करत काही जणांनी वेगळा निर्णय घेतला आहे. तसेच त्यांनी आपल्या विरोधात केंद्रीय निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात उभा दावा टाकला आहे. या दोन्ही ठिकाणी सुप्रिया ताई सुळे आणि जितेंद्र आव्हाड हे दोघे वकिलांना मदत करत आहेत. पण लवकरच तुमच्या (कार्यकर्त्यांना उद्देशून) राष्ट्रवादीचं म्हणण योग्य आहे खरं आहे असं ऐकायला मिळेल असे आशादायक वक्तव्य केले.
शरद पवार पुढे बोलताना म्हणाले, आज देशात जे सत्तेवर आहेत. त्यांच्याकडून सत्तेचा गैरवापर सुरु आहे. प्रत्येक ठिकाणी सत्तेचा गैरवापर करून राज्यांमध्ये सत्तेवर येत आहेत. तसेच सामाजिक विद्वेष पसरविण्याचे काम करत आहेत. पण तुम्ही जर देशाचा नकाशा पाहिला तर लोकं त्यांच्यासोबत नसल्याचे दिसून येत आहे. केरळ हे शेवटचं राज्य तेथे त्यांची सत्ता नाही, तेथे कम्युनिस्ट पक्षाची सत्ता आहे. तामीळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकात त्यांची सत्ता नाही. गोव्यामध्येही त्यांची सत्ता नव्हती. पण काही पक्षातील आमदारांना फोडून तेथे सरकार स्थापन केलं. तसेच मध्य प्रदेशमध्येही कमलनाथ यांचे सरकार असताना तेथील दुसऱ्या पक्षाचे आमदार फोडून भाजपाची सत्ता स्थापन करण्यात आली. राजस्थान, दिल्लीमध्ये, पंजाबमध्ये भाजपा आहे का असा सवाल करत तेथील जनताही भाजपासोबत नसल्याचे स्पष्ट केले.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, मध्यंतरी मी पत्रकार परिषदेत म्हणालो की, एका महिन्यात १९ हजार महिला गायब झाल्या आहेत. त्यावर राज्य सरकारकडून खुलासा देण्यात आला की, १९ हजार महिलांना शोधून त्यांच्या घरी पोहोचवून देण्यात आल्याचं. पण विधानसभेत आपले आमदार अनिल देशमुख यांनी यासदंर्भातचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी सरकारनेच दिलेल्या छापील उत्तरात १९ हजार महिला गायब नसल्याची माहिती दिली. या महिलांच्या घरची परिस्थिती त्यावेळी काय असेल, त्यांची अवस्था काय असेल याचा नुसता विचारच केलेला बरा असे सांगत पोलिसांनी दिलेला खुलास्यावर भाष्य केले.
शरद पवार म्हणाले, त्यांची सत्ता घालवून पुन्हा सर्वसामान्य लोकांच्या हितांची जपणूक करणाऱ्या लोकांच्या हातात सत्ता देण्यासाठी आपण इंडिया आघाडीत आहोत. त्या आघाडीत आपल्या विचाराचे इतरही पक्ष आहेत. ते सर्वजण सत्तेचा गैरवापर करणाऱ्या सत्ताधारी पक्षाच्या विरोधात लढत असल्याचंही सांगितलं.
शरद पवार पुढे बोलताना म्हणाले, आज त्यांच्या विरोधात जो बोलेल, लिहील अशांच्या विरोधात सरकारी तपास यंत्रणा वापरण्यात येत आहे. त्यामुळे दिल्लीत आम आदमी पार्टीचे लोक आणि काही पत्रकारांच्या विरोधात या तपास यंत्रणांचा वापर करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून तुम्ही आम्ही मिळून सत्तेचा गैरवापर करणाऱ्या पक्षाच्या हातून सत्ता काढून घेऊन ती सर्वसामान्यांच्या हाती देण्यासाठी आपल्याला लढायचं असल्याचंही शरद पवार यांनी शेवटी सांगितले.