मनोज जरंगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासंदर्भात वक्तव्ये करून अडचणीत आलेले मनसे नेते राज ठाकरे यांनी या वादात पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी पडू नये अशा सुचना दिल्या आहेत. कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा असेही आदेशही मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिले. दरम्यान मराठी पाट्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली २५ नोव्हेंबरच्या मुदतीची आठवण दुकानदारांना करून द्या असे आदेशही राज ठाकरे यांनी यावेळी दिले.
राज्यात सध्या मराठा-ओबीसी आरक्षणाचा वाद सुरू आहे. काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर राज ठाकरे यांनी शंका उपस्थित केली होती. मी जेव्हा मनोज जरांगे पाटील यांना भेटलो होतो, तेव्हा अशा प्रकारे आरक्षण मिळणार नाही असं मी बोललो होतो. परंतु आता यामागे जरांगे पाटील आहेत की त्यांच्यामागे कोण आहे? त्यातून महाराष्ट्रात जातीय तेढ निर्माण करायचे असं आहे का? असे प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केले होते . त्यांच्या या वक्तव्यानंतर जरांगे पाटील तसेच मराठा नेत्यांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
राज ठाकरे यांनी आज शिवतीर्थ या निवासस्थानी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.
त्यावेळी आरक्षणाच्या वादात पक्षाच्या नेत्यांनी पडू नये असे आदेश राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिल्या. राज ठाकरे यांनी काही दिवसापुर्वी आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करू असे सांगितले होते. मात्र लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा असे आदेश मनसे अध्यक्षांनी पदाधिकाऱ्यांना दिले.
मनसे नेत्यांच्या या महत्त्वपूर्ण बैठकीत मराठा ओबीसी आरक्षण, आगामी निवडणुका यासह इतर विषयांवरही बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली. लोकसभासह इतर निवडणुका आहेत, त्या डोळ्या समोर ठेऊन कामाला लागा अशा सूचना यावेळी केल्या सर्वोच्च नायायालयाने २५ नोव्हेंबर पर्यंत मराठी पाट्यांसाठी दुकानदारांना मुदत दिली आहे. ज्या दुकानदारांनी अद्याप पाट्या बदलल्या नसतील अशा दुकानदारांना या मुदतीची आठवण करून द्या असे आदेशही राज ठाकरे यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना दिले.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे २५ नोव्हेंबर २०२३ पर्यंत 'महाराष्ट्रातील दुकानांवर ठळक मोठ्या अक्षरात मराठी पाट्या असायला हव्यात'… शेवटचे ४ दिवस ! https://t.co/8aQ9o9IOw7
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) November 21, 2023