Breaking News

लोकसभा अध्यक्ष, विधानसभाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय विधायक संमेलनाचे उद्धघाटन

जनहिताची जपणूक करण्याची राज्यघटनेने दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडत भारतीय लोकशाही अधिक बळकट करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

‘एमआयटी’च्यावतीने जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे देशातील विधानसभा आणि विधानपरिषदेचे लोकप्रतिनिधी यांचे राष्ट्रीय विधायक संमेलन भारत २०२३ चे आयोजन करण्यात आले. यावेळी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, लोकसभेचे माजी अध्यक्ष शिवराज पाटील चाकूरकर, सुमित्रा महाजन, मीरा कुमार, शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, पद्मश्री अनिल गुप्ता, ‘एमआयटी’चे विश्वनाथ कराड, देशातील विधानमंडळांचे पीठासन अधिकारी व अन्य मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आपल्या भारतीय संस्कृतीला हजारो वर्षांची समृद्ध परंपरा आहे. लोकशाहीची मूल्ये भारतीयांच्या मनात घट्टपणे रुजली आहेत. भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी आणि सर्वात भक्कम अशी लोकशाही पद्धती मानली जाते. ही आपणा सर्वांसाठीच अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. लोककल्याणकारी राज्यासाठी आवश्यक असलेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिलेली राज्यघटना ही जगातील सर्वोत्तम राज्यघटना आहे. या अमृत काळात भारताची लोकशाही अधिक मजबूत होत आहे. देश सर्वार्थाने विकसित होत आहे. संसदीय लोकशाहीत विविध विचारधारा असू शकतात, मार्ग वेगळे असू शकतात मात्र आपल्या सगळ्यांचे अंतिम उद्दिष्ट मात्र एकच आहे. ते म्हणजे भारतीय लोकशाही मजबूत करणे, समृद्ध करणे. आपल्याकडे उभारण्यात आलेल्या यंत्रणा आणि व्यवस्था अतिशय उत्तम आणि पारदर्शक आहेत. सर्व व्यवस्थांच्या भूमिका आणि मर्यादा अगदी सुस्पष्ट आहेत. एवढ्या मोठ्या खंडप्राय देशात निवडणूका अतिशय निर्भय, निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने होतात. समाजातील तळागाळातील लोकांच्या इच्छा-आकांक्षा विधिमंडळात प्रतिबिंबित होत असतात. कोणत्याही सरकारला विधानमंडळात विधेयक मांडल्याशिवाय कोणताही खर्च करता येत नाही, ही आपणास लोकशाहीने दिलेली अमूल्य भेटच आहे. आपण सर्वजण जनतेला उत्तरदायी आहोत ही भावना आपण नेहमी जपली पाहिजे.

विधिमंडळात सर्व पक्षांनी विधेयकावर सांगोपांग चर्चा केलीच पाहिजे. त्यानंतरच सर्वाच्या विचाराने, एकमताने जनहिताचे कायदे तयार केले पाहिजेत. राष्ट्रीय विधायक संमेलन या उपक्रमाच्या माध्यमातून भारतीय लोकशाही अधिक बळकट होण्यासंदर्भात सखोल विचारमंथन होईल, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर म्हणाले, देशातील विधानमंडळांच्या पीठासीन अधिकाऱ्यांसाठी आयोजित हे संमेलन अतिशय उपयुक्त ठरेल. संसदीय लोकशाही परंपरा अधिक समृद्ध करण्याची उज्वल परंपरा याव्दारे कायम राहील. भारतीय लोकशाही बळकट करण्यात सर्वच देशवासीयांचे अमूल्य योगदान असून विश्वस्त भावनेतूनच ही परंपरा पुढे नेण्याची गरज असल्याचे अॅड. नार्वेकर यांनी सांगितले.

लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन म्हणाल्या, ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही आपली संस्कृती आहे. ती आपण जपली पाहिजे. आपल्याला राजमाता जिजाऊ आणि अहिल्याबाई यांचा वारसा लाभला आहे. लोकप्रतिनिधींनी आपल्या मतदारसंघातील प्रश्नांचा सखोल अभ्यास करणे गरजेचे आहे. तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून सगळ्यांना सोबत घेऊनच जनहिताची कामे केली पाहिजेत. समाजाला योग्य मार्गावर पुढे नेणारा म्हणजे नेता. महिला कुटुंबाचा सर्वार्थाने विकास करतात. समतोल साधण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणांमुळे महिला राजकारणात अधिक यशस्वी होऊ शकतात. विविध राज्यांतील चांगल्या प्रथा-परंपरांचे अनुसरण, आदानप्रदान आपण करणे गरजेचे आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणाच्या प्रयत्नांत आपण सर्वांनी मिळून योगदान दिले पाहिजे, असेही श्रीमती महाजन यांनी सांगितले.

भारतभरातून विधिमंडळ सदस्यांनी आणलेल्या जलकुंभाची आणि मृत्तिकाघटाची पाहणी मान्यवरांनी केली. लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रतिकात्मक स्वरूपात सर्व मान्यवरांच्या हस्ते लोकशाहीच्या घंटेचा निनाद यावेळी करण्यात आला‌.

या संमेलनात देशभरातील सुमारे दोन हजार मंत्री,आमदार सहभागी झाले आहेत.

Check Also

दक्षिण मुंबईत शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांना उमेदवारी

मुंबईतील असली नसली शिवसेनेवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूकीच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *