Breaking News

सुप्रिया सुळे यांचा हल्लाबोल, महिलांवरील वाढत्या अत्याचाराला राज्याचे गृहखाते जबाबदार

केंद्र व राज्य सरकार महिलांच्याबाबतीत अतिशय असंवेदनशील आहे. दिल्लीत महिला कुस्तीपटूंची केस ज्यापद्धतीने पोलिसांनी हाताळली हा पहिला मुद्दा आणि महाराष्ट्रात सातत्याने महिलांच्या विरोधात ज्या पध्दतीच्या घटना वाढत चालल्या त्याला सर्वस्वी राज्याचे गृहखाते जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत केला.

दरम्यान मरीन ड्राईव्ह येथील त्या मुलीच्या नातेवाईकांनी आजच भेट घेतली असून सरकारला लवकर यासंदर्भात पाऊले टाकण्याची विनंती करणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे आज कार्याध्यक्षा म्हणून निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादी भवनमध्ये आल्या असता त्यांचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकार्‍यांनी ढोलताशांच्या गजरात आणि फुलांची उधळण करत जंगी स्वागत केले. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझ्यासाठी अजून तरी लोकशाही आहे, त्यामुळे एखाद्याने टीका केली तरी त्यांना टिका करण्याचा अधिकार आहे. मी अजूनही लोकशाहीत जगत आहे असे प्रत्युत्तर टीकाकारांना दिले.
महाराष्ट्रात गणवेशासोबत अनेक रॅकेट आहेत त्यातील दोन उघड केली आहात त्याबद्दल चॅनलचे सुप्रिया सुळे यांनी आभार मानले. कारण एका – एका मंत्र्यांकडे दहा ते पंधरा खाती आहेत. जिल्हा परिषद, मनपा या निवडणुका झाल्या नाहीत. हे महाराष्ट्र नक्की कोण चालवत आहे. हे सुपरमॅन नाहीत. सत्ता एका ठिकाणी राहू नये म्हणून शेवटी सत्तेचे विकेंद्रीकरण जे चव्हाणसाहेबांनी केले. आज ते चित्र उलट दिसत आहे. पुण्यात एक आयुक्त शहर चालवत आहे. एवढ्या नगरसेवकांचे काम एकटा माणूस करतोय. जिल्हा परिषद एकच माणूस चालवत आहे. हे अशक्य आहे. कारण ही सत्ता एकाच ठिकाणी केंद्रीत ठेवणे लोकशाही म्हणा किंवा लोकशाहीपासून दूर हा देश आणि राज्य चालत आहे हे दर्शवते आहे असेही म्हणाल्या.

शिंदे गटाने दिलेल्या जाहिरातीवरून सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अशा पध्दतीने करोडो रुपयांच्या जाहिराती देणारे कोण आहेत याचा शोध मी आणि अजितदादा घेत आहोत. मात्र अजूनही असा हितचिंतक कोण सापडला नाहीय. असे हितचिंतक आपल्यालाही मिळाले पाहिजेत आणि फुलपेज करोडो रुपयांच्या जाहिराती पेपरला मिळाल्या तर आमचेही भले होईल आणि त्यांचेही भले होईल. त्यामुळे अशा लोकांच्या शोधात आहोत. असे हितचिंतक सापडले तर आमचा नंबर त्यांना द्या असा खोचक टोलाही शिंदे गटाचे नाव न घेता लगावला.

तसेच पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, हे आपण हसण्यावारी नेतोय पण हे फार दुर्दैवी आहे. पक्ष आणि सत्तेत असणारे एवढे मोठे लोक जाहिरातीमध्ये दंग होत असतील तर या राज्याचे काम कुठल्या दिशेने सुरू आहे याबाबत चिंता व्यक्त करतानाच सरकारला पॉलिसीकडे लक्ष द्यायला वेळ नाही. फक्त तू तू मै मै किंवा तू पोस्टर लावले म्हणून मी लावले जर याच्यातच ते राहणार असतील तर पॉलिसीचा कोण विचार करणार आहे असा सवालही शिंदे-फडणवीस सरकारला केला.

तसेच पक्षाने सोपविलेल्या जबाबदारीबद्दल बोलताना यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, कार्याध्यक्ष पदाच्या कामाचे विभाजन हे क्लीअरकट झालेले आहे. माझा मतदारसंघ महाराष्ट्रात आहे. अर्थात संघटनेची जबाबदारी माझ्यावर आली आहे. त्यामुळे दिल्लीतील लोकसभा आणि प्रफुल पटेल यांना राज्यसभा असे कामाचे क्लीअरकट विभाजन झाले आहे. त्यामुळे सर्व जबाबदारी माझ्या एकटीवर नाहीय. टीमवर्क म्हणून आम्ही देशात काम करतोय. प्रत्येकाचा रोल वेगवेगळा आहे. घरात लग्न असले की एकटाच धावपळ करत नाही तर प्रत्येकाला जबाबदारी दिलेली असते, त्यामुळे पक्ष म्हणून, एक कुटुंब म्हणून आम्ही काम करतो आहोत. हे काम करत असताना प्रत्येकाची वेगवेगळी जबाबदारी वाटण्यात आली आहे. लोकसभेच्या तयारीला राष्ट्रवादी काँग्रेसने केव्हाच सुरुवात केली आहे. त्याबाबत अनेक बैठका झाल्या आणि सविस्तर चर्चाही झाल्या आहेत. त्यानंतर महाविकास आघाडीमध्ये या चर्चा केल्या जातील असेही स्पष्ट केले.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *