महाराष्ट्र सरकारने सरकारी कार्यालयातील सर्वच पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा ६ सप्टेंबर २०२३ रोजी काढलेल्या शासन निर्णय विरोधात संभाजी ब्रिगेड कामगार संघटनेने आज मंत्रालयात घुसून जोरदार घोषणाबाजी करीत पत्रके भिरकावली. मंत्रालयाची सुरक्षे यंत्रणा कडक केलेली असतानाही झालेल्या या आंदोलनामुळे पोलिसांची भंबेरी उडाली मंत्रालय पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेऊन मरीन लाईन पोलिसांच्या ताब्यात दिले.
सरकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांसह अतिकुशल, कुशल, अर्ध कुशल व अकुशल कर्मचारी अशी सर्वच पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याच्या निर्णयाविरोधात संभाजी ब्रिगेडचे २ ऑक्टोबर पासून आझाद मैदानात आमरण उपोषण चालू आहे. संघटनेचे मुंबई अध्यक्ष राजेंद्र कांबळे, मंगेश लोहकरे, सुनील कोठावळे, प्रवीण मकवाना आदी पदाधिकारी उपोषणास बसलेले असता आतापर्यंत फक्त काँग्रेसचे आमदार तथा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी आझाद मैदानात येऊन उपोषणकर्त्यांची भेट घेतली. संघटनेच्या मागण्या जाणून घेतल्या. त्यांच्या व्यतीरिक्त सरकारच्या वतीने कोणताही नेता वा प्रतिनिधी येथे फिरकलेला नाही. सरकारकडून दखल घेतली नाही. या कारणास्तव आज संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲड. मनोज आखरे आणि महासचिव सौरव खेडेकर यांच्या मार्गदर्शननुसार मुंबई अध्यक्ष सुहास राणे यांच्या नेतृत्वात पदाधिकाऱ्यांनी मंत्रालयात घुसून सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला.
मंत्रालयात वारंवार आंदोलने केली जातात. त्यामुळे राज्य सरकारने बाहेरील अभ्यागतांसाठी नियम कडक केले आहेत. मात्र तरीही संभाजी ब्रिगेडने पोलीस यंत्रणेला गुंगारा देत आज आंदोलन केले.
पोलिसांनी संभाजी ब्रिगेड मुंबई प्रवक्ते प्रमोद शिंदे ,मुंबई उपाध्यक्ष श्रिकांत गिरी, उत्तर पश्चिम जिल्हा अध्यक्ष प्रशांत मेढे तालुका अध्यक्ष दिंडोशी महेश मोरे, उत्तर मुंबई जिल्हा सचिव पुनम प्रमोद शिंदे, उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष पल्लवी पाटील जिल्हा उपाध्यक्ष .निशा शेख सर्व आंदोलन कर्त्यांना मंत्रालयातून ताब्यात घेऊन मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे येथे येथे ताब्यात दिले . पोलिसांनी या सर्व आंदोलनकर्त्यांवर कलम ३७(१)ई (३),१३५ म.पो.का नुसार गुन्हा दाखल केला आहे.