ऑक्टोबर झाल्यानंतर तापमानाचा ताप अधिक वाढला असून आर्द्रतेमुळे होणारी काहिली, सातत्याने पाणी पिऊनही घशाला पडणारी कोरड अशी अवस्था ऑक्टोबरच्या पहिल्याच पंधरवड्यात अनुभवायला मिळत आहेत. मुंबईमध्ये किंचित कमी तापमान असूनही ताप मात्र अधिक जाणवत होता. मुंबईत सांताक्रूझ येथे कमाल तापमानाची नोंद झाली. हे तापमान सरासरीपेक्षा २.१ अंशांनी अधिक होते. हे तापमान आणखी एक ते दोन अंशांनी वाढण्याची शक्यता आहे.
मेघराजाने माघार घेतल्यानंतर सध्या पूर्व आणि ईशान्येकडून वारे येत आहेत. यामुळे तापमानात वाढ झाली आहे. मुंबईमध्ये सांताक्रूझ येथे बुधवार कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस नोंदले गेले तर कुलाबा येथे ३३ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. कुलाबा येथेही मंगळवारी सोमवारच्या तुलनेत ०.४ अंशांनी तापमान खाली उतरले. मात्र आर्द्रतेचे प्रमाण अजूनही ७० ते ८० टक्क्यांच्या पुढे असल्याने उकाड्याने मुंबईची जनता बेहाल झाली आहे.
तर दुसरीकडे कोकण विभागात मंगळवारी सर्वाधिक कमाल तापमान सांताक्रूझ येथे होते. सध्या वारेही जाणवत नसल्याने वातावरणात प्रदूषके साचून राहिल्याचेही दिसत आहे. यामुळे मुंबईच्या हवेतील प्रदूषण निर्देशांक वाढताना दिसत आहे. मुंबईच्या हवेचा प्रदूषण निर्देशांक मंगळवारी १०५ नोंदला गेला. कोकण विभागात मुंबई वगळता उर्वरित केंद्रांवर सरासरीपेक्षा कमाल तापमान खूप वाढलेले नाही. रत्नागिरी केंद्रावर १.६ अंशांनी तापमान वाढ मंगळवारी नोंदली गेली.