सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) ४ टक्के वाढवून ४६ टक्के केला आहे. याचा थेट फायदा सुमारे ४८.६७ लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६७.९५ लाख पेन्शनधारकांना होणार आहे. बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.
सरकारने दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठी भेट दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्त्यात वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली. कर्मचाऱ्यांना नोव्हेंबरपासून वाढीव पगार मिळणार आहे. यात जुलै ते ऑक्टोबर या कालावधीतील थकबाकीचाही समावेश असेल. या निर्णयामुळे सरकारला दरवर्षी १२,८५७ कोटी रुपयांचा फटका बसणार आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी मंत्रिमंडळाच्या निर्णयांची माहिती दिली.
रेल्वे विभागातील ११ लाख ०७ हजार ३४० अराजपत्रित कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांच्या पगाराइतका बोनस देण्याचा निर्णयही घेण्यात आल्याचे केंद्रीय मंत्री म्हणाले. यासाठी १,९६९ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. हा उत्पादकता लिंक्ड बोनस २०१०-२०११ पासून दिला जात आहे.
महागाई भत्त्यात वाढ झाल्याने केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाईपासून मोठा दिलासा मिळणार आहे. अलीकडच्या काळात अन्नधान्य महागाईत मोठी वाढ झाली आहे. मात्र, किरकोळ महागाईचा दर सप्टेंबरमध्ये ५.०२ टक्क्यांवर आला आहे, जो ऑगस्टमध्ये ६.८३ टक्के होता. यापूर्वी जुलै २०२३ मध्ये किरकोळ महागाई दर ७.४४ टक्क्यांवर पोहोचला होता.