आगामी लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाला सशक्त पर्याय देण्यासाठी देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी इंडिया आघाडीची स्थापना केली. या इंडिया आघाडीची उद्या गुरूवार ३१ ऑगस्ट रोजीपासून तिसरी दोन दिवसीय बैठक मुंबईत होत आहे. या पार्श्वभूमीवर बैठकीसाठी करण्यात आलेल्या तयारीची माहिती देण्यासाठी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आदी उपस्थित होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांवरील सततच्या टीकेवर म्हणाले, आम्ही सोबत असणाऱ्यांवर नेहमी टीका करतो. तरीही आम्ही आघाडीत एकत्र असतो असे मिश्किल उत्तर दिले.
त्यानंतर शरद पवार म्हणाले, प्रसारमाध्यमांनी कितीही टीका केली तरी आम्ही काही काम करायचं थांबत नसतो. त्यामुळे आम्ही आमचं काम करत असतो. तुम्ही तुमचं काम करा असे सांगत सामनातील टीकेचा महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम नाही असे स्पष्ट केलं.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, आम्ही भारत मातेला कोणत्याही हुकूमशाहकडून बेड्या घातल्या जावू नये म्हणून आम्ही एकत्र आलो आहोत. तसेच देशातील लोकशाही जिवंत रहावी आणि ती टिकून राहण्यासाठी आमच्यात वैचारीक मतभेद असले तरी आम्ही एकत्र आल्याचे सांगत देशातील संस्था टीकवून ठेवण्याच्या उद्देशानेच इंडियाची स्थापना करण्यात आली आहे. शिवाय आम्ही कोणाही एका व्यक्तीच्या विरोधात नसून हुकूमशाही वृत्तीच्या विचारधारेच्या विरोधात आहोत.
यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी सवाल केला की तुमच्या आघाडीत अनेक राजकिय पक्ष आहेत. मात्र पंतप्रधान पदाचा चेहरा कोण असणार आहे? त्यावर उद्धव ठाकरे मोठे तिरकस उत्तर देत म्हणाले, आमच्याकडे इंडियात पंतप्रधान पदासाठी अनेक चॉईस आहेत. मात्र भाजपाकडे मोदी नंतर कोण ? असा खोचक सवाल करत खरे तर हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे होता असे सांगत मुंबईतील बैठकीचे समन्वयक आम्ही आहोत मात्र भाजपाच्या एनडीए अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा संयोजक कोण आहे असाही सवालही केला.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, वास्तविक पाहता इंडिया या आघाडीची मुंबईतील ही तिसरी बैठक आहे. मात्र भाजपा आणि मोदी इतके घाबरले आहेत की, आता त्यांच्या पक्षाचे पंतप्रधान पद गॅसवर असल्याचा टोला लगावत त्यांनी पहिल्यांदाच गॅसच्या किंमती लक्षात घेऊन गॅसच्या किंमती कमी केल्या असल्याचे सांगत निवडणूका जिंकण्यासाठी उद्या गॅस सिलेंडर फुकट घेऊन जा म्हणतील असा उपरोधिक टोलाही नरेंद्र मोदी यांना लगावला.
यावेळी मुंबईचा विकासाच्या नीती आयोगाच्या बैठकीबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, काही विषय सोडले तर इतर गोष्टींबाबत निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारला असतात. पण त्यांचा हस्तक्षेप इतका वाढला आहे की ते प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप करत आहेत. त्याची सुरुवात दिल्लीतून करण्यात आल्याचे सांगत हाच प्रकार महाराष्ट्रात सुरु झाला आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना त्यांचा तोच प्रयत्न होता. परंतु त्यांना ते शक्य नसल्यानेच महाविकास आघाडीचे सरकार पाडल्याचा आरोप भाजपावर केला.
तसेच पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, पाच राज्यातील विधानसभेच्या निवडणूकांबरोबर लोकसभा निवडणूका घेण्याचे घाटत असेल तर मी तर म्हणतो महापालिकांच्या निवडणूकाही सोबत घ्या असे आवाहन केले.