इंडिया आघाडीची बैठक उद्यापासून मुंबईत सुरु होत आहे. या बैठकीसाठी देशभरातील प्रमुख २८ विरोधी पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत. त्यात काँग्रेससह राजदचे लालूप्रसाद यादव, जनता दल युनायटेडचे प्रमुख तथा बिहारचे मुख्यमंत्री नीतीशकुमार, तामीळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टलिन, समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांसह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. मात्र या बैठकीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना निमंत्रित करण्यात आले आहे. मात्र राजू शेट्टी अद्याप त्या बैठकीला गेले नाहीत. यापार्श्वभूमीवर स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा महाविकास आघाडीचे जूने सहकारी राजू शेट्टी यांना विचारले असता इंडिया आघाडीच्या बैठकीला जाण्याबाबत निर्णय अद्याप झाला नसल्याचे सांगितले.
राजू शेट्टी म्हणाले, इंडिया आघाडीच्या बैठकीचे निमंत्रण काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आले होते. परंतु स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा निर्णय अजून झालेला नाही. एप्रिल २०२१ मध्ये महाविकास आघाडीसोबतचे संबंध तोडल्यानंतर नेत्यांनी आमच्याशी संपर्क साधेलेला नव्हता. किमान महाविकास आघाडी का सोडली हे तरी महाविकास आघाडीतील नेत्यांनी विचारायला हवे होते. परंतु तसा काही संवाद झाला नाही आणि आम्ही ही त्याचा पुर्नविचार केला नाही. महाविकास आघाडीतील जवळपास सर्वच घटक पक्ष इंडिया आघाडीत गेले आहेत. मात्र स्वाभीमानी शेतकरी संघटनेने तसा निर्णय घेतलेला नाही असे स्पष्ट केले.
तसेच पुढे बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, देशभरातील सर्व शेतकरी संघटनेने एकत्र येवून एमएसपी गॅरंटी मोर्चा स्थापन केलेला आहे त्याचा घटक स्वाभीमानी शेतकरी संघटना आहे. या मोर्चाची बैठक १९ ऑगस्टला झाली, यामध्ये जोपर्यंत एमएसपी गॅरंटी नाही तोपर्यंत मत नाही, कोणताही निर्णय नाही अशी भूमिका घेण्यात आली. जो काही निर्णय होईल तो २७ राज्यातील शेतकरी संघटना घेतील. त्यामुळे इंडिया आघाडीच्या बैठकीला जाणार नाही असेही सांगितले.