मागील काही महिन्यांपासून आंतरधर्मिय विवाह केलेल्या जोडप्यांमधील एकाची हत्या झाल्याच्या काही घटना उघडकीस आल्या. त्यानंतर भाजपा आमदार नीतेश राणे, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी त्या घटनांना लव्ह जिहादचा रंग देण्याचा प्रयत्न करत महाराष्ट्रातही या पध्दतीचा कायदा करण्याची मागणी केली. त्यावर अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली लव्ह जिहाद कायद्याचा अभ्यास करण्यासाठी समितीची स्थापना केली. त्यानंतर आता भाजपाच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी चित्रा वाघ यांनी याविषयीची मागणी करत उत्तर प्रदेशच्या धर्तीवर राज्यात लव्ह जिहादचा कायदा यायला पाहिजे अशी मागणी केली.
पिंपरी-चिंचवड येथे आयोजित पत्रकार परिषदेत चित्रा वाघ बोलत होत्या.
यावेळी चित्रा वाघ बोलताना म्हणाल्या की, मुलींना लग्नाचं अमिष दाखवून पळवून नेलं जातं. धर्मांतरासाठी जबरदस्ती केली जाते. हे पाहता लव्ह जिहादचा कायदा आलाच पाहिजे, असं मत व्यक्त केले.
महिलांनी बोलताना आपली एक रेषा आखून ठेवली पाहिजे. बोलताना मर्यादा ओळखून बोललं पाहिजे. टाळ्या, शिट्ट्या अशी भाषा वापरली तरच मिळेल असा जर कोणाचा गैरसमज असेल तर तो करू नये. तो फार काळ टिकत नाही, असे म्हणत शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांचं नाव न घेता त्यांना टोला लगावला. संजय राऊत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मस्थळावरून केलेल्या वक्तव्यवर त्यांनी माफी मागावी अशी मागणी देखील त्यांनी केली.
चित्रा वाघ म्हणाल्या की, महाराष्ट्राची संस्कृती आपल्याला माहिती आहे. त्यामुळे आपण ही बोलताना आपली भाषा नीट वापरली पाहिजे. शब्दांचा नीट उपयोग केला पाहिजे. महिलांनी बोलताना आपली एक रेषा आखून घेतली पाहिजे. संस्कृतीच्या बाहेर झालं असेल तर लोकांचा तो उद्वेग असतो, तो ते व्यक्त करतात. नीलम गोऱ्हे या वरिष्ठ नेत्या आहेत. त्यांच्याबाबत असा वाद उद्भवला असं मी पाहिलं नाही. टाळ्या, शिट्ट्या अशी भाषा वापरली तरच मिळतात असा जर गैरसमज कोणाचा असेल तर तो करू नये, तो फार काळ टिकत नसतो. महिला आणि पुरुषांनी जबाबदारीने वागलं पाहिजे. महाराष्ट्राची संस्कृती आहे एकमेकांना कोपर खळ्या मारतो. प्रत्येकाने आपली मर्यादा ओळखून बोललं पाहिजे असेही त्या म्हणाल्या.
मुलींना पळवून नेणं, लग्नाचं अमिष दाखवणं, मुलींवर जबरदस्ती करणे, त्यांच्या आणि परिवारासाठी कुठलाच कायदा नाही. श्रद्धा वालकरची केस पुढे आल्याने हा विषय मोठा झाला आहे. आई वडिलांना ठोकर मारून तीने प्रेम केलं. त्या व्यक्तीवर विश्वास टाकला. तिचा अंत खूप वाईट झाला जो तिने कधीच विचार केला नसेल. मुलींना लग्नाचं अमिष दाखवून मुलीवर जबरदस्ती धर्मांतर करण्याच्या या गोष्टी मोठ्या प्रमाणावर आहेत. म्हणून, उत्तर प्रदेशच्या धर्तीवर लव्ह जिहाद कायदा यायलाच पाहिजे असेही त्या म्हणाल्या आहेत.