मुंबई :प्रतिनिधी
रेल्वेमधील अॅप्रेंटिसच्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराची चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधानसभेत करत रोजगार निर्मितीत सरकार अपयशी ठरल्यानेच बेरोजगारांना रोज आंदोलने करावी लागत असल्याची टीका केली. तर विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी हे सरकारचे अपयश असल्याची टीका करीत या विषयावर सरकारने निवेदन करावे अशी मागणी केली.
मंगळवारी सकाळी झालेल्या या आंदोलनामुळे मुंबई शहरातील उपगनरीय रेल्वे सेवा ठप्प होऊन लाखो प्रवाशांचा खोळंबा झाला होता. विखे पाटील यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास सुरू होण्यापूर्वी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून या गंभीर घटनेकडे सभागृहाचे लक्ष वेधले.
केंद्र सरकारने वर्षाला २ कोटी रोजगार देण्याची घोषणा केली होती. परंतु, तरूणांना रोजगार उपलब्ध होत नसल्यामुळे त्यांना आंदोलनांच्या माध्यमातून रोज आपला असंतोष व्यक्त करावा लागतो आहे. राज्यातील हजारो रेल्वे अॅप्रेंटिस आज सकाळी त्यांना रेल्वे सेवेत समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी माटुंगा येथे रेल्वे रूळांवर उतरले. ते सातत्याने आपल्या मागण्यांसंदर्भात दाद मागत होते. परंतु, सरकारने वेळीच त्याची दखल घेतली नाही. आज सकाळी आंदोलन झाल्यानंतरही मंत्री किंवा राज्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन तोडगा काढण्याचे प्रयत्न केले नाहीत. त्यातच त्यांच्यावर अमानुष लाठीमार करण्यात आल्याची बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून यासंदर्भात शासनाने निवेदन करावे, अशी मागणी केली.
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी या विषयावर सरकारला धारेवर धरले. विद्यार्थ्यांचे आजचे झालेले आंदोलन म्हणजे सरकारच्या इन्टेलिजियसचे अपयश असल्याची टीका केली रेल्वे मंत्रालयाशी संबंधित हा विषय असला तरी या आंदोलनामुळे मुंबईची जनता वेठीस धरली गेली सरकारने या प्रश्नी निवेदन करावे अशी मागणीही त्यांनी केली.
त्यावर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीला आंदोलकांनी दगड फेक केली…त्यांनंतर लाठी चार्ज केलापण त्यात कोणी जखमी झालेल नाही. सध्या त्यांच्याशी चर्चा सूरु आहे. त्यांना नोकरीत घ्यावं अशी मागणी होती. १००% अप्ररेंटींस लोकांना नोकरी द्यावी अशी त्यांची मागणी होती. पण तसं केल्यास अन्य शिक्षित तरुणावर अन्याय होईल. त्यामुळे त्यांच्यासाठी २० % जागा राखीव ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.