Breaking News

राज्यातील भाजपा सरकारची ‘विकसित भारत संकल्प यात्रा’, विकास चा पत्ता?

२०१४ साली केंद्रात भाजपाप्रणित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थानापन्न झाले. त्यावेळी देशातील पहिल्या टप्प्यात ५० शहरांची निवड स्मार्ट सिटी या योजनेंतर्गत मोदी सरकारने केली. त्यानंतकर १५० शहरांची निवड करण्यात आली. पुढे देशातील प्रत्येक राज्य सरकारांवर या स्मार्ट सिटीची निर्माण करण्याची जबाबदारी राज्य सरकारने सोपविली. ही योजना सुरु होऊन जवळपास ९ वर्षे ८ महिने पूर्ण होत आली आहेत. पण देशातील नव्हे तर महाराष्ट्रातील किती शहरे स्मार्ट सिटीत परावर्तित झाली याबाबतचा उत्तर अद्यापही अनेकांना मिळालेले नाही. तसेच स्मार्ट सिटीच्या नावाखाली किती कामे पूर्ण झाली याची माहिती दस्तुरखुद्द राज्य सरकारच्या नगरविकास विभागाकडेही अद्याप उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. त्यातच केंद्र सरकारच्या आदेशानुसार राज्यातही विकसित भारत संकल्प यात्रेचा शुमारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी नुकताच केला.

केंद्र शासन पुरस्कृत योजनांची परिपूर्णता साध्य करण्यासाठी १५ नोव्हेंबर २०२३ ते २६ जानेवारी २०२४ या कालावधीत ‘विकसित भारत संकल्प यात्रे’चे राज्यात आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील दहा महानगरपालिकांची निवड करण्यात आली असून, बृहन्मुंबईसाठीच्या यात्रेतील चार वाहनांचा शुभारंभ आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शालेय शिक्षणमंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते मंत्रालय परिसरात आज करण्यात आला.

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. इक्बालसिंह चहल, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराज, महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे, महानगरपालिकेच्या नियोजन विभागाच्या संचालक डॉ. प्राची जांभेकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुंबईतील विविध २२७ ठिकाणांवर ही चार वाहने फिरणार असून विविध योजनांसाठी पात्र असलेल्या परंतु लाभापासून वंचित असलेल्या घटकांपर्यंत केंद्र शासनाच्या योजनांची माहिती पोहोचविणे व त्याबाबत जागृती करणे, शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणे, निश्चित केलेल्या पात्रतेनुसार संभाव्य लाभार्थी यांची यात्रेमध्ये नोंदणी करणे आदी या यात्रेची उद्दिष्टे आहेत. या यात्रेदरम्यान विविध योजनांचे लाभार्थी या वाहनांना भेट देऊन थेट लाभ घेऊ शकतात.

आयुष्मान हेल्थ कार्ड, उज्ज्वला योजना, पीएम स्वनिधी योजना, आधार कार्ड आदी विविध योजनांचा या यात्रेअंतर्गत समावेश करण्यात येत आहे. या महत्वाकांक्षी योजना समाजातील शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचण्यासाठी, योजनांबाबतची जनजागृती करून योजनेची परिपूर्णता साध्य करण्यासाठी ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ उपयुक्त ठरणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. ही यात्रा राज्यातील एकूण ४१८ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थातील २०८४ परिसरातून फिरणार आहे.

विकसित भारत संकल्प यात्रेच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील बृहन्मुंबई महानगरपालिका, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, नागपूर महानगरपालिका, सोलापूर महानगरपालिका, नाशिक महानगरपालिका, वसई-विरार महानगरपालिका, पुणे महानगरपालिका आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका या दहा महानगरपालिकांची निवड करण्यात आली आहे.

राज्यात अवर्षणग्रस्त परिस्थिती असताना पाऊसाच्या पाण्याची योग्य साठवणूक आणि त्याचा पुनःरवापर धोरण अद्याप करण्यात आलेले नाही. त्यामुळे अनेक जिल्ह्यात पुरेसा पाऊस पडलेला असतानाही ऐन दिवाळीत ही शहरे कोरडी पडल्याचे दिसून येत आहेत. त्यातच कधीकाळी दुष्काळी जिल्हे म्हणून ओळखले जाणारे जिल्ह्यांमध्येही किमान १२ माही पिण्याचे पाणी स्थानिक नागरिकांना उपलब्ध होत होते. मात्र गेल्या काही वर्षात या बारमाही पाणी मिळणाऱ्या जिल्ह्यांमध्येही आता सुरुवातीला दोन-तीन दिवसाआड, तर आता चक्क दर १० दिवसांनी पिण्याचे पाणी उपलब्ध होत आहे.

यासंदर्भात स्थानिक स्वराज्य संस्थाकडे काही तक्रार करायला गेले तर माजी पदाधिकारी म्हणतात, अहो ही परिस्थिती कमी पाऊसामुळे आहे. पण पिण्याच्या पाण्याचे नियोजन प्रशासकाकडून करण्यात येते. त्यावर संबधित झोनच्या अधिकाऱ्यांना आणि प्रशासनाला केली तर तो वार्ड दुसऱ्या हद्दीत येतो, माझ्या हद्दीत अमका वार्ड येतो त्यामुळे तिथेच पाणी देणार सारखी उत्तर प्रशासकिय अधिकाऱ्याकडून देण्यात येतात. इतरकेच नव्हे तर सहा दिवसानंतर येणारे पाणी सगळ्यांच्या घरात पुरेसे येते की नाही याची खातरजमा करण्यासाठी तक्रार केली तरी ती पाहायची तसदी संबधित अधिकाऱ्यांकडून करण्यात येत नाही.

देशात आणि राज्यात मोठ्या गाजावाजा करत भाजपाप्रणित सरकारने ज्या काही घोषणा केल्या त्यातील पायाभूत विकासाच्या योजना आणि लोकांच्या दैनंदिन पूर्ण होणाऱ्या गरजा पूर्ण होताना दिसत नाहीत. मग अशा परिस्थितीत विकसित भारत संकल्पना यात्रेतून राज्यातील भाजपा प्रणित राज्य सरकारला नेमके चित्र निर्माण करायचे आहे, असा सवाल राज्यातील जनतेकडून उपस्थित करण्यात येत आहे.

Check Also

पवन खेरा यांची टीका, नरेंद्र मोदींचा प्रचार भरकटला… धार्मिक ध्रुविकरणाचा प्रयत्न

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तोंड उघडले की वाद निर्माण होत आहेत. १० वर्षातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *