जळगांव लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांना डावलून भाजपाने विधानपरिषदेच्या आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहिर केली. त्यामुळे नाराज झालेले खासदार उन्मेश पाटील यांनी भाजपाला सोडून शिवसेना उबाठा पक्षात प्रवेश केला. केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपा पक्षाची खासदारकी सोडून शिवसेना उबाठा गटात प्रवेश केल्या बद्दल शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वागत केले.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, सध्या देशात एकतर्फी वातावरण असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. विरोधकांनी कितीही जनतेच्या मुद्यांना हात घातला तरी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येते. त्यामुळे शिवसेना उबाठा गटातून कोणी गेला की शिवसेना उबाठा गटाला धक्का असे जाहिर पणे सांगितले जाते. पण असल्या धक्क्याने कोलपडून पडणारी शिवसेना नसल्याचे सांगत शिवसेना एकदाच धक्का देते आणि सगळंच बदलून टाकते असे सांगितले.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, या सगळ्या घडामोडींवर उन्मेश पाटील यांनी जे केले त्याला गद्दारी म्हणता येत नाही. पण आमच्याकडे जे झालं ती गद्दारीच आहे. कारण शिवसेनेने अनेकांना मोठं केलं. परंतु मोठं झालेल्यांनी तुरुंगात जाण्यापासून स्वतःला वाचविण्यासाठी म्हणून ते तिकडे गेल्याचा आरोप शिंदे गटावर करत त्यातील काही जण काही इतके वाईट नव्हते. पण ते गेले असे सांगताच आता सर्वसामान्य आणि निष्ठावंत शिवसैनिकांना आम्ही आता मोठं करण्याचा निर्णय घेतला असल्याचेही यावेळी सांगितले.
पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांची पत्रकार परिषद । मातोश्री, मुंबई – LIVE https://t.co/t1Yl4mD8Pq
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) April 3, 2024
यावेळी काही प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी, इतर शिल्लक राहिलेल्या जागांवरील उमेदवार कधी जाहिर करणार असा सवाल उद्धव ठाकरे यांना विचारला. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी थेट प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना थेट लिहून घ्या असे सांगत कल्याणमधून निष्ठावंत महिला शिवसैनिक वैशाली दरेकर-राणे यांना आम्ही कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देत असून गद्दारांची गद्दारी मोडीत काढण्यासाठी इतकी ती सक्षम असून तीनेच शिवसेनेच्या केलेल्या कामामुळे कल्याण-डोंबिवलीत मोठे झाले असे सांगत हातकणगंले लोकसभा मतदारसंघातून सत्यजीत पाटील यांना उमेदवारी जाहिर करत आहोत. पालघरमधून लोकसभा मतदारसघातून आदिवासी महिला भगिणी भारती कांबळे यांना उमेदवारी जाहिर करत जळगांवमधून कोणाला उमेदवारी द्यायची अशी विचारणा उपस्थित काही कार्यकर्त्यांना केली. शेवटी उद्धव ठाकरे यांनीच करण पवार यांना उमेदवारी देत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी जाहिर केले.
त्याचबरोबर मुंबईतील उर्वरित राहिलेल्या जागांबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेनेने मुंबईतील चार जागांवर आधीच उमेदवार जाहिर केलेले आहेत. परंतु मुंबई उत्तर आणि अन्य एक जागा आमच्या मित्र पक्षांनी लढवावी या दृष्टीने आमची चर्चा सुरु असल्याचेही यावेळी सांगितले. त्याचबरोबर बोरीवली आणि वांद्रेची जागाही मित्र पक्षाने लढवावी अशी इच्छाही यावेळी व्यक्त केली.