कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात बातमी लिहिली म्हणून पत्रकार शशिकांत वारिशे हत्या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण गरम झाल्याचे दिसत आहे. तसेच विरोधकांकडून या मुद्यावरून शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला जात असतानाच शिवेसना(ठाकरे गट) चे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या हत्या प्रकरणावरून पत्रही लिहिले आहे. शिवाय, देवेंद्र फडणवीस यांनी आंगणेवाडीतील सभेत केलेल्या एका विधानाचा उल्लेख करत, संजय राऊत यांनी शशिकांत वारिशे हत्या प्रकरणावरून मोठं विधानही करत वारिशे हत्या प्रकरणातील आरोपी आणि शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांचा एक फोटो आज ट्विट केला. यामुळे उलटसुलट चर्चांना राजकिय वर्तुळात उधाण आले.
प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, पत्रकार शशिकांत वारिशे यांनी माझ्या माहितीप्रमाणे रिफायनरी येणार म्हणून ज्यांनी भविष्यात विकण्यासाठी कवडीमोल किंमतीत जमिनी घेतल्या, हे जमीनदार कोण आहेत? या संदर्भातील माहिती देण्यास सुरुवात केली होती. रिफायनरी समर्थक, सरकार पक्षातील सध्याचे काही लोक, रत्नागिरीमधील काही राजकारणी, यांचं या प्रकरणात जमिनी घेण्यात कसं परप्रांतीयांबरोबर साटंलोटं आहे. राजापूरात, नाणारच्या आसपास अब्जावधी रुपयांच्या जमिनींचे व्यवहार झाले. त्यासंदर्भात शशिकांत वारिशे यांनी बोलायला आणि लिहायला सुरुवात केली होती. त्यामुळे ते त्या भागातील काही राजकारण्यांच्याही डोळ्यात खूपत होते.
व्यक्ती को कुचल देनेसे विचार नही मरता.
पत्रकार शशिकांत वारीसे यांचा खून राजकीय आहे. नाणार परिसरात नेत्यांनी बेनामी जमीन खरेदी मोठ्या प्रमाणात केली आहे.
त्या सर्व सावकार आणि जमीनदारांनी मिळून शशिकांत यांचा काटा काढण्यासाठी सुपारी दिली.शशिकांत चा खुनी पंढरीनाथ आंबेरकर कोणाबरोबर? pic.twitter.com/XRbZALhOxT— Sanjay Raut (@rautsanjay61) February 11, 2023
याचबरोबर जे पालकमंत्री सध्या आहेत आणि ज्यांनी सुपारी घेतलेली आहे, रिफायनरी आणणारच किंवा तिथले जे केंद्रीय मंत्री आहेत आणि त्यांचं कुटुंबं आहे. काही झालं तरी विरोध मोडून काढून आम्ही रिफायनरी आणणारचं. अंगणेवाडीच्या जत्रेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक जाहीर सभा घेतली आणि त्या सभेत रिफायनरीच्या विरोधकांना धमक्या दिल्या. रिफायनरी करून दाखवतो, कोण आडवं येतं पाहू. अशाप्रकारची भाषा केली आणि लगेच दुसऱ्या दिवशी शशिकांत वारिशे यांची हत्या झाली. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. २४ तास अगोदर राज्याचे गृहमंत्री सांगतात, रिफायनरीला कोण आडवं येतंय ते पाहू आणि दुसऱ्या दिवशी रिफायनरीला आडवा येणारा एक तरूण पत्रकार मारला जातो. याचा काय संबंध लावायचा, हा योगयाग समजायचा की अजून काय समजायचं? असा सूचक सवालही उपस्थि केला.
याशिवाय, या महाराष्ट्रात आणि देशात कालपर्यंत जे आपल्या विरोधात आवाज उठवतील, जे आपल्या विरोधात लिहितील आणि बोलतील, जे आपल्या विचारांचे नाहीत त्यांना ईडी, सीबीआय, पोलीस, प्राप्तिकर विभाग अशा यंत्रणांच्या माध्यमातून अडवकवलं जात होतं, तुरुंगात पाठवलं जात होतं आता हे सरकार एक पाऊल पुढे गेलं आहे. आता विरोधात बोलणारे आणि लिहिणाऱ्यांच्या हत्या होऊ लागल्या आहेत. ही या महाराष्ट्राच्या कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती आहे. ही गुंडशाही आहे, जी महाराष्ट्रात सुरु झाली आहे. असं म्हणत संजय राऊत यांनी टीका केली.
मा.गृहमंत्री
महाराष्ट्रात हे काय सुरू आहे? pic.twitter.com/AlpM1U4Twh— Sanjay Raut (@rautsanjay61) February 11, 2023