समाजात अस्वस्थता निर्माण होते त्यावेळी निर्माण झालेल्या परिस्थितीचा राजकीय फायदा घेणे योग्य ठरु शकत नाही. सर्वच राजकीय पक्षांनी जबाबदारीने आज ज्या परिस्थितीतून महाराष्ट्रातील स्थिती जातेय त्यामध्ये सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. राजकारण करायचे असते त्यावेळी करता येते परंतु आता राजकारण करायची ही वेळ नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी मंत्रालयात माध्यमांशी बोलताना विरोधकांना खडेबोल सुनावले.
सुनिल तटकरे पुढे बोलताना म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी राज्य सरकार विशेष प्रयत्न युध्दपातळीवर करत आहे असेही यांनी स्पष्ट केले.
पुढे बोलताना सुनिल तटकरे म्हणाले, कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण दिले पाहिजे यासाठी राज्यसरकार सातत्याने प्रयत्नशील आहे परंतु ज्यापध्दतीने सकल मराठा समाजाने शांततापूर्ण आंदोलने केली, मोर्चे काढले गालबोट न लागता ही आंदोलने झाली होती. अशी शांततापूर्ण आंदोलने फक्त सकल मराठा समाजाकडून झालेली पहायला मिळाली आहेत. मात्र अलीकडे जे काही घडत आहे. ते सर्वांसाठी चिंताजनक, क्लेशकारक आहे. त्यामुळे राज्यसरकार प्रयत्न करत आहे अशावेळी शांतता मार्गाने आंदोलन व्हावे अशी विनंती मराठा समाजाला केली.
आज मुंबईत जे आमदार उपस्थित होते त्यांच्याशी राज्यात जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यावर चर्चा केली, त्याबाबत माहिती घेतली असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.