शिवसेना ( ठाकरे गट ) नेत्या सुषमा अंधारे यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून सुषमा अंधारेंनी हिंदू देवी-देवतांना आणि साधु संतांबद्दल करण्यात आलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यावरून महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ आक्रमक झाला आहे. वारकरी महामंडळाकडून सुषमा अंधारेंविरोधात तक्रार देखील दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे वारकरी महामंडळ अंधांरेविरुद्ध आक्रमक झाला आहे. तर, आळंदीत त्यांच्या विधानाचा निषेध म्हणून प्रेतयात्रा काढण्यात आली. याप्रकरणावर आता सुषमा अंधारेंनी भाष्य केले.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सुषमा अंधारे म्हणाल्या, भागवत संप्रदायातील संत परंपरेला वाटत असेल, मी चुकत आहे. पण, मी एकाही पक्षाची, राजकीय नेत्याची माफी मागितली नाही, कारण ती माझी स्टाईल आहे. तरीसुद्धा कळत नकळत माझ्या बोलण्याने वारकरी संत सांप्रदायातील भावना दुखावल्या असतील, तर क्षमा मागण्यासाठी काही गैर वाटणार नाही.
२०१७-१८ साल किंवा शिवसेनेत प्रवेश केल्यापासून मी या विषयांबद्दल जास्त विधान करत नाही. आधी जरी त्या विषयांवर भाष्य केलं, तरी त्याच्या मागील लॉजिक समजून घेतलं पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा एक आणि नंतर एक भूमिका मांडली. त्यांना याबद्दल विचारण्यात आलं, यातील कोणती भूमिका महत्वाची मानायची. त्यावेळी बाबासाहेब म्हणाले, मी नंतर जे बोललो ते जास्त महत्वाचं आहे, असा संदर्भ सुषमा अंधारेंनी दिला.
वारकऱ्यांकडून माझी प्रेतयात्रा काढण्यात आली. इतिहास साक्षी आहे, या देशात अनेक समाज सुधारकांच्या प्रेतयात्रा काढण्यात आल्या. राजकीय सुडबुद्धीने हे करण्यात आल्याने याचा थोडा खेद वाटतो. मात्र, वारकऱ्यांनी राजकारणात घुसू नये. अशी प्रेतयात्रा वारकरी संप्रदायातील बसत नाही. किंबहुना प्रेतयात्रेजवळ कोणी भगवा फेटा घालून बसत नाही. माझ्या प्रेतयात्रेत एक महाराज भगवा फेटा घालून होते. या भगव्या रंगाचा तुम्ही अवमान करत आहात, असा सवालही त्यांनी यावेळी केला.