Breaking News

शरद पवार यांचा इशारा, पिकविणारे जर संकटात तर खाणारे उपाशी…

संपुर्ण जगात शेतीक्षेत्रात मोठे बदल होत आहेत. वेगवेगळे आधुनिक संशोधन सुरु आहे. ते संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार असेल तरच हे संशोधन उपयोगी ठरणार आहे. हे संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी ‘कृषक’ अत्यंत उपयुक्त आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आधुनिक शेतीकडे वळण्याचा संदेश दिला.

बारामती येथील कृषि विकास प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित जागतिक स्तरावरील कृषक या कृषि प्रदर्शनाचे उदघाटन पवार यांच्यासह कर्नाटकचे कृषिमंत्री एन चेलुवरय्या स्वामी यांच्या उपस्थितीत पार पडले.

शरद पवार पुढे बोलताना सांगितले की, कृषी विकास प्रतिष्ठानच्या वतीने आणि कृषी विकास केंद्राच्या वतीने राजेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली गेले काही वर्ष आपण हे कृषिक या ठिकाणी आयोजित करतो. शेतीच्या क्षेत्रामध्ये दुनियेत बदल होत आहेत. नवनवीन संशोधन होत आहे, या संशोधनाचा उपयोग शेती उत्पादनाच्या संदर्भात होत आहे आणि ते तुम्हा लोकांपर्यंत पोहोचायला हवे तोच खरा संशोधनाचा उपयोग आहे आणि म्हणून कृषिक सारखे कार्यक्रम हे संशोधकांनी केलेले काम पोहोचवण्यासाठी आणि तुम्हा लोकांना काय बदल होत आहेत, त्याचे वाचनाचे सूत्र काय आहे ? हे समजून घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त पर्याय आहेत असे म्हणाले.

शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, एकदा यशवंतराव चव्हाण यांना प्रश्न विचारला की, या देशाचे शेतीचे प्रश्न काय आहेत आणि किती आहेत त्यांनी उत्तर दिलं की, १० तोंडी रावण असतो तसे शेतीचे प्रश्न आहेत. तो एकच प्रश्न आहे असं नाही, पाण्याचा प्रश्न, जमिनीचा पोत कसा सांभाळायचा ?, कोणते बियाणे चांगले कोणते नकली ?, गुंतवणूक केल्यानंतर त्याला मिळणारी किंमत ही योग्य आहे का ?, शेतीचा धंदा आजतागायत कसा होत आहे त्याबद्दलचे अनेक प्रश्न आणि या प्रश्नांची सोडवणूक करणे हेच खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना मदत करण्यासारखे आहे. यात ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्यांची जबाबदारी अधिक आहे आणि म्हणून विशेषतः केंद्र सरकारची जबाबदारी अधिक असते, पण अलीकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यांचा बदललेला आहे. दिल्लीमध्ये कधी-कधी पार्लमेंटमध्ये केंद्र सरकारच्या माणसांबरोबर मला चर्चा करण्याची संधी मिळते आणि शेतीमालाच्या किमतीचा प्रश्न हा मी उपस्थित केल्यानंतर मला बोलतात, काहीही सांगतात तुम्ही पिकवणारे आम्ही खाणारे; या देशात पिकवणारे किती आणि खाणारे किती ? याचा जर अंदाज घेतला, तर पिकवणाऱ्यांपेक्षा खाणाऱ्यांची संख्या जास्त आहे आणि मी सांगत होतो की, पिकवणारा हा जर कर्जबाजारी झाला, तो संकटात गेला तर, खाणाऱ्यांना उपाशी राहावे लागेल असा इशाराही दिला.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, मला आठवतंय त्या काळामध्ये मी मंत्री होतो आणि माझ्याकडे अन्न पुरवठा खाते होतं आणि त्या वेळेला दुष्काळ पडला, धान्य परदेशातून आले आणि ते धान्य ज्वारीच्या ठिकाणी निरं होतं आणि त्या निराची लाल भाकरी मला माहिती नाही तुमच्यापैकी कोणी पाहिली का ? ती भाकरी खायचा प्रसंग केवळ उत्पन्न घटलं आणि दुष्काळ पडला म्हणून या देशांमध्ये आलेला होता आणि ती स्थिती येऊन द्यायची नसेल तर, शेतकऱ्याचे उत्पादन, त्याची उत्पादन क्षमता, त्याच्या उत्पादनाची किंमत, यावर कर्ज होऊ शकत नाही आणि म्हणून एक आंदोलन झाले. मी नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादकांकडे गेलो होतो आणि कांद्याच्या किमती ढासळल्यात, त्यांचा उत्पादन खर्च देखील निघत नव्हता; फक्त परदेशात कांदा पाठवला, तर किंमत मिळत होती, पण केंद्र सरकारने परदेशामध्ये कांदा पाठवायला ४०% ड्युटी बसवली असल्याचंही सांगितलं.

शरद पवार म्हणाले की, मला आठवतंय की, मी शेती खात्याचा केंद्रात मंत्री होतो, कांद्याच्या किमती वाढल्यात; पार्लमेंटचे हाऊस सुरू झाले आणि विरोधी पक्षाचे भाजपचे लोक कांद्याच्या माळा गळ्यात घालून पार्लमेंटमध्ये आले आणि घोषणा सुरू केल्या की, शरद पवार इस्तीफ़ा दो । स्पीकरने विचारलं काय आहे ? कशासाठी या घोषणाबाजी चालू आहेत ? तर विरोधकांनी सांगितलं की, कांद्याच्या दरात प्रचंड वाढ झालेली आहे आणि त्याला जबाबदार कृषिमंत्री आहे आणि म्हणून त्यांचा आम्ही राजीनामा मागत आहोत. मला अध्यक्षांनी विचारलं तुम्ही खुलासा करा, मी त्यांना सांगितलं की, रोजच्या खाण्यामध्ये तुमचा कांद्याचा खर्च किती आहे ? तांदूळ, डाळी, ज्वारी, तेल, तिखट या सर्वांचा खर्च असेल, परंतु यात कांद्याचा किती खर्च आहे ? आणि एखाद्या दिवशी कांदा खाल्ला नाही, तर माणूस उपाशी राहिला असे होत नाही आणि म्हणून हा कांदा उत्पादक शेतकरी गरीब आहे आणि या गरीब शेतकऱ्याला दोन पैसे जास्त मिळत असतील, तर लगेचच किमती थांबवण्यासाठी बंदी घाला ही मागणी मला मंजूर नाही. तुम्ही कांद्याच्या माळा घाला नाहीतर काहीही करा, मी कांद्याची किंमत खाली येऊ देणार नाही, मी त्या शेतकऱ्याला त्याची किंमत मिळालीच पाहिजे त्यासाठी काहीही सहन करायला तयार आहे, शेवटी सर्वजण गप्प बसले आणि त्यांनी मान्य केले.

शरद पवार म्हणाले की, राजेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही वर्षांपासून प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे. यातून शेतकऱ्यांना महत्वाची माहिती मिळते. शेती फायद्याची होण्यासाठी कृषि संशोधन महत्वाचे आहे. शेतकऱ्यांना कृषकच्या माध्यमातून उपयुक्त माहिती उपलब्ध होईल, असे नमुद केले.

खासदार सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, ‘ए-आय’ तंत्रज्ञानावर आधारीत शेती संशोधन बारामतीत सुरु होत आहे, हे अभिमानास्पद आहे. येत्या वर्षात आपल्या भागात या तंत्रानामुळे क्रांती होइल, असे म्हणाल्या.

‘ए-आय’ तंत्रज्ञान ऊस शेतीसाठी उपयुक्त ठरणार आहे. महाराष्ट्र देशात उस उत्पादनात अग्रेसर आहे. मात्र, ऊस उत्पादनात अनेक अडचणी आहेत. याबाबत बळीराजासमोर अनेक संकटे आहेत. आपल्याकडे ऊस उत्पादन सरासरी ४० ते ५० टन आहे, तर हेच उत्पादन ब्राझीलमध्ये एकरी १७० ते २०० टनावर पोहचले आहे. ‘ए आय’ तंत्रज्ञानामुळे हे शक्य झाल्याचे कृषि विकास प्रतिष्ठानचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी सांगितलल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

Check Also

काँग्रेस नेते नसीम खान यांची नाराजी दूर म्हणाले, वर्षा गायकवाड माझ्या लहान बहिण

लोकसभा निवडणूकीच्या उमेदवारीवरून काहीसे नाराज झालेल्या काँग्रेसचे माजी आमदार नसीम खान यांनी काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *