मुंबई : प्रतिनिधी
१ जानेवारी रोजी भिमा कोरेगाव येथे झालेल्या दलितांवरील हल्ल्याप्रकरणी मिलिंद एकबोटे याबरोबर संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी यास अटक करण्याच्या मागणीवर भारिप बहुजन महासंघाचे नेते अँड.प्रकाश आंबेडकर आणि पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते प्रा.जोगेंद्र कवाडे आग्रही आहेत. त्यासाठी कवाडे यांच्या पक्षाच्यावतीने मुंबईतील आझाद मैदानावर आज मोर्चा काढण्यात आला. तर प्रकाश आंबेडकर हे सोमवारी मोर्चा काढत आहेत. मात्र केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी भिडे प्रकरणी बोटेचेपी भूमिका स्विकारत कवाडे, आंबेडकरांच्या आंदोलनातील हवा काढून घेण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.
भिमा कोरेगावमध्ये आंबेडकरी जनतेवर झालेल्या हल्ल्या प्रकरणी जे जबाबदार आहेत त्यांना अटक झाली पाहिजे अशी भूमिका मंत्री आठवले यांनी घेत या प्रकरणी जर संभाजी भिडे जबाबदार असतील तर त्यांना जरूर अटक झाली पाहिजे अशी जर तरची भूमिका घेत कवाडे, आंबेडकर यांच्या भूमिकेपासून वेगळी भूमिका घेतली आहे.
मलबार हिल येथील सह्याद्री अतिथिगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
प्रकाश आंबेडकरांनी २६ मार्चला काढलेला मोर्चा हा त्यांच्या गटाचा आहे. मात्र जर त्यांना सर्व समाजाचा मोर्चा काढायचा होता. तर त्यांनी सर्व गटांशी चर्चा करायला पाहिजे होती. त्याबाबत आमच्या पक्षाशी काहीही बोलणे झाले नसल्यामुळे त्यांच्या मोर्चात आम्ही सहभागी होणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.