पंतप्रधान मोदी यांनी मध्यप्रदेशातील भोपाळ येथे आज भाजपाच्या बुथ कार्यकर्त्यांना दृकश्राव्य पद्धतीने मार्गदर्शन केले. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच विरोधकांच्या झालेल्या बैठकीचा संदर्भावरून विरोधांवर टीका करताना शरद पवार यांच्यावर तसंच महाराष्ट्रातील विविध घोटाळ्यांचा संदर्भ देत विरोधकांवर जोरदार टीका केली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर तब्बल ७०,००० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे, असं एकही क्षेत्र नाही जिथे काँग्रेसने घोटाळा केला नसेल असा आरोप केला. त्यास शरद पवार यांनी प्रत्युत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आरोपातील खोटेपणा उघडकीस आणला.
यावर शरद पवार यांनी पंतप्रधानांच्या वक्तव्यावर बोलताना म्हणाले, पंतप्रधानांनी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांनी स्वतः विचार करण्याची गरज आहे. शिखर बँकेचा त्यांनी उल्लेख केला. मी कधी शिखर बँकेचा मेंबर नव्हतो. कर्ज कधी मी घेतले नव्हते. मी त्या संस्थेचा कधीच सदस्य नव्हतो. तेव्हा याबाबत बोलणे कितपत ठीक आहे ?. सिंचनाच्या बाबत त्यांनी वक्तव्य केलं मात्र ते खरे नाही अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे.
शरद पवार पुढे म्हणाले, त्यांनी जो उल्लेख केला त्यात शिखर बँक हे प्रकरण न्यायालयात गेले आहे. त्यात माझा शिखर बँकेसोबत काही संबंध नाही हे स्पष्ट झालेले आहे. सुप्रिया सुळे यांचे नाव घेतले त्यांचे काही कारण नाही, अशा इन्स्टिट्यूट सोबत त्या राहत नाहीत हे बहुतांश लोकांना माहीत आहे. परंतु मोठ्या प्रमाणावर देशातील विरोधी पक्षाचे लोक एकत्र येतात, देशाच्या समस्येबाबत चर्चा करतात, ही गोष्ट काही लोकांना पटत नाही. त्यामुळे अशा पद्धतीचे विधाने केली जातात, यापेक्षा अधिक काही बोलण्याची आवश्यकता नाही. असे खडे बोल पवार यांनी लगावले आहेत.