Breaking News

प्रकाश आंबेडकर यांचा अल्टीमेटम…अन्यथा ४८ जागा लढविणार इंडिया आघाडीने सात दिवसात निर्णय घ्यावा

सन २०१९ च्या लोकसभा ६.९८ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ५.५७ टक्के मते मिळविणाऱ्या पक्षाला आघाडीचे आमंत्रण का पाठवले गेले नाही किंवा सामील केले गेले नाही, आम्हाला इंडिया आघाडीत घेण्यासंबधी काँग्रेसला रस आहे का, या संबधी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पाठविलेल्या पत्राच्या उत्तराची अपेक्षा आहे असे सांगत जर सात दिवसात उत्तर आले नाही तर लोकसभेच्या सर्व ४८ जागा आम्ही लढवू असा अल्टिमेटम वजा इशारा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांनी आज दिला.

फोर्ट येथील वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर बोलत होते.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, १ सप्टेंबर २०२३ रोजी, वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते ॲड. प्रियदर्शी तेलंग यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना एक ईमेलद्वारे पत्र पाठविले. त्यावेळी काँग्रेस आणि त्यांचे सहयोगी इंडिया आघाडीच्या तिस-या बैठकीसाठी मुंबईत होते.

प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की, ई-मेल त्यांना दोन प्रमुख कारणांसाठी लिहिला होता. एक म्हणजे मुंबईत इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी वंचित बहुजन आघाडीला आमंत्रण पाठवले असल्याच्या त्यावेळच्या अफवा खोडून काढण्यासाठी काँग्रेसला विनंती करणे, आणि दुसरे म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे दरवाजे खुले आहेत हे सांगणे याकरीता ई-मेल पाठविल्याचे सांगितले.

आज भाजपा-आरएसएस देशाला बर्बाद करत आहेत. जर इंडिया आघाडी भाजपा-आरएसएसच्या फुटीरवादी विचारसरणी आणि राजकारणाशी लढण्यास खरोखरच गंभीर असेल, तर प्रत्येक धर्मनिरपेक्ष आणि समविचारी पक्षांना सहभागी करून घेणे काँग्रेसचे कर्तव्य आहे. परत एकदा सांगतो, आमचे दरवाजे खुले आहेत”, असे तेलंग यांनी लिहिलेल्या ई-मेलच्या समारोपाच्या परिच्छेदात म्हटल्याचा खुलासा प्रकाश आंबेडकर यांनी केला.

ई-मेल पाठवून आणि तेलंग यांचे पुर्वीचे ट्विटर हँडलवर वरील मजकूर सार्वजनिक करून जवळपास एक महिना झाला आहे, परंतु मल्लिकार्जुन खर्गे किंवा काँग्रेस मधील त्यांच्या कोणत्याही सहकाऱ्याकडून कोणताही प्रतिसाद आलेला नाही असेही प्रकाश आंबेडकर सांगत म्हणाले पुढे बोलताना म्हणाले की, आम्हाला कधीतरी उत्तर मिळणार आहे का, हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे. जर उत्तर मिळणार नसेल तर काँग्रेसने महाराष्ट्रातील जनतेला समजावून सांगावे की, काँग्रेसला वंचित आणि बहुजनांना आघाडीत सहभागी का करून घ्यायचे नाही याचा खुलासा काँग्रेसने करावा अशी मागणीही केली.

पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, २०१९ च्या लोकसभा ६.९८ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ५.५७ टक्के मते मिळविणाऱ्या पक्षाला आघाडीचे आमंत्रण का पाठवले गेले नाही किंवा सामील केले गेले नाही याचे स्पष्टीकरण त्यांनी द्यावे. २०१९ पासून ज्या पक्षाची लोकप्रियता आणि मतदारांची संख्या वाढली आहे. तो पक्ष युतीत का नाही याचे स्पष्टीकरण दिले पाहिजे. तसेच काँग्रेसकडून चालवल्या जाणार्‍या सर्व खोट्या बातम्या आणि कथा तसेच सोशल मीडियावर नव्याने कामाला लावलेल्या ट्रोल्स् कडून खोटारडेपणा थांबवला पाहिजे असेही यावेळी सांगितले.

तसेच प्रकाश आंबेडकर म्हणाले, जर काँग्रेसला आमच्या ई-मेलचे उत्तर द्यायचे असेल आणि आमच्यासह आघाडी करायची असेल तर पुढील सात दिवसांत उत्तर द्यावे अन्यथा, आम्ही सर्व ४८ जागा लढवण्याची आमची तयारी आहे. त्यादृष्टीने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्व जागा लढविण्याच्या निश्चित मार्गावर आहोत असेही स्पष्ट केले.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या चार टप्प्यात ६६.९५ टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या चार टप्प्यात एकूण मतदान ६६.९५% इतके नोंदवले गेले आहे, निवडणूक आयोगाने गुरुवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *