मुंबईः प्रतिनिधी
देशाची राज्यघटना बदलण्याचा भाजपचा मनसुबा असल्याची जाहीर कबुली केंद्रीय राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांनी दिल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्या पुढाकाराने सर्वपक्षिय संविधान बचाव आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा २६ जानेवारी २०१८ रोजी मुंबईत होणार असून या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी दिली. तसेच भारतात लोकशाही टिकून राहावी हाच आमचा प्रयत्न राहिल आणि त्यासाठी आम्ही सर्व प्रकारचे प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले.
बॅलार्ड पिअर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष अशोक धात्रक, प्रदेश उपाध्यक्ष भारती पवार आदी उपस्थित होते.
यवतमाळ ते नागपूर दरम्यान काढलेल्या हल्लाबोल मोर्चाचा दुसरा टप्पा १६ जानेवारीपासून तुळजापूर येथून सुरू होत आहे. तेथेही लोकांचा उदंड प्रतिसाद मिळेल याबाबत शंका नाही. उत्तर महाराष्ट्रातील हल्लाबोल आंदोलनासाठीची आढावा बैठकही आज पार पडली. या आंदोलनाची सांगता शरद पवार यांच्या सभेने नाशिक येथे होणार असून त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बोंडअळी रोगाने कापूस शेतीचे झालेले नुकसान, ओखी वादळाच्या तडाख्याने मच्छिमार तसेच शेतकऱ्याना बसलेला फटका, शेतकऱ्यांना न मिळालेली कर्जमाफी या प्रश्नांचा पाठपुरावा हिवाळी अधिवेशनात केला. विरोधी पक्षाच्या आक्रमकतेमुळे सरकारने मदतीचा घोषणा केली. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ३० हजार रूपयांची मदत देण्याची घोषणा सरकारने केली होती. त्या घोषणेची पूर्तता अद्याप झालेली नाही. या सरकारने कर्ज घेण्याचा विक्रम नोंदवला आहे. मात्र सर्व सामन्य जनता पायाभूत सोयी–सुविधांपासून वंचित आहे. राज्याची अर्थव्यवस्था ढासळली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात श्वेतपत्रिका काढण्याची मागणी आम्ही सरकारकडे करणार असल्याचेही ते म्हणाले. समाजात अशांतता पसरली आहे. भीमा–कोरेगाव प्रकरण हाताळण्यात सरकार अपयशी ठरले आहे. या सर्व परिस्थिती जनता त्रस्त झाली आहे. सरकारच्या अकार्यक्षमतेचा विरोधी पक्षाच्या विविध स्तरावर केला जात आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विविध ठिकाणी मेळावे घेऊन जनजागृती केली जात आहे. महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यादेखील महिला अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवत असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.