Breaking News

मुख्यमंत्री जरी फितूर झाले तरी नाणार प्रकल्पाला विरोधच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा निर्धार

मुंबई : प्रतिनिधी

कोकणातील पेट्रोलियम कंपन्यांच्या रिफायनरी प्रकल्पा संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तेथील स्थानिक जनतेवर लादणार नसल्याची घोषणा केली. मात्र मुख्यमंत्र्यांनी घोषणा करूनही केंद्राने हा प्रकल्प नाणार रहिवाशांवर लादला असून मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला दिल्लीत किंमत नसल्याची टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी करत मुख्यमंत्री पिचक्या पाठ कण्याचे निघाल्याचा आरोप केला. त्याचबरोबर कोणत्याही परिस्थितीत नाणारचा प्रकल्प होवू देणार नसल्याची इशाराही त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारला एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिला.

विशेष म्हणजे उध्दव ठाकरे हे उन्हाळा सुट्टी घालविण्यासाठी सध्या जपान येथे असून तेथूबन त्यांनी प्रसिध्दी पत्रक जाहीर केले.

राजापूर तालुक्यातील नाणार येथे पेट्रोलियम कंपन्याकडून रिफायनरीचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. मात्र या प्रकल्पामुळे मच्छिमारीबरोबरच पर्यावरणावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होणार असल्याने या प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे. तसेच शिवसेनेनेही याप्रकल्पाला मोठ्या प्रमाणावर विरोध दर्शवित यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली. त्यानुसार शिवसेना नेते तथा राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणार येथील जनतेवर रिफानरीचा प्रकल्प लादणार नसल्याची घोषणा केली होती.

तरीही यासंदर्भात केंद्र सरकारने भारत पेट्रोलियम, हिंदूस्थान पेट्रोलियम आणि दुबईच्या एका कंपनीबरोबर नुकताच त्रिपक्षीय करार करण्यात आला. तसेच या प्रकल्पामुळे महाराष्ट्र आणि कोकणातील जनतेचा फायदाच होईल अशी भूमिका केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्विकारली आहे.

दरम्यान, स्थानिकांचा विरोध डावलून नाणारचा रिफायनरी प्रकल्प शिवसेना कदापी होवू देणार नाही. विकासाच्या नावाखाली कोकणचे वैभव मारू नका, निसर्ग मारून कोकणची राख रागोंळी करू नका असा सज्जड इशारा देत या प्रकल्पामुळे आंबा, बांबूची वने नष्ट होणार असल्याची भीतीही उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर झालेल्या चर्चेत हे सर्व मुद्दे आले होते. त्या मुद्यांना त्यांनी होकारही दिला होता. मात्र हा करार करताना माझ्या जनतेवर अन्याय होत मी गप्प बसणार नाही असे दिल्लीस मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगायला हवे होते. परंतु मुख्यमंत्री फितूर झालेले असले तरी शिवसेना हा प्रकल्प होवू देणार नसल्याचे उध्दव ठाकरे यांनी शेवटी सांगितले.

त्यामुळे नाणार प्रकल्पावरून पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजप असा सामना चांगलाच रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Check Also

नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण

मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *