Breaking News

उत्तर प्रदेशातील १६ जागांसाठी मायावती यांनी जाहिर केली बसपा उमेदवारांची यादी पुन्हा कमबॅक करणार की ?

देशाच्या लोकसभा निवडणूकीत उत्तर प्रदेशातील ८० जागा महत्वाच्या असून आतापर्यंत भाजपा वगळता या ८० जागांवर कोणालाही लक्ष्य देता आले नाही. मात्र २०२४ च्या लोकसभा निवडणूकीत काहीही करून नरेंद्र मोदी आणि भाजपाला रोखायचे आणि केंद्रातील सत्तेपासून लांब ठेवायचे अशी रणनीती काँग्रेससह प्रमुख विरोधी पक्षांनी निश्चित केली. परंतु देशात इंडिया आघाडीचा प्रयोग सुरु झाल्यानंतर समाजवादी पक्षाबरोबर काँग्रेसने मायावती यांच्या बहुजन समाज पार्टी अर्थात बसपालाही सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु या आघाडीत सहभागी होण्यास मायावती यांनी नकार देत स्वतंत्र निवडणूकांना सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. परंतु मागील काही वर्षापासून उत्तर प्रदेशच्या राजकारणातून गायब झालेल्या मायावती २०२४ निवडणूकीत त्यांच्या पक्षासह कमबॅक करतील अशी चर्चा रंगली असतानाच बसपाने उत्तर प्रदेशातील १६ लोकसभेच्या जागांसाठी उमेदवारांची पहिली यादी आज रविवारी जाहिर केली.

बहुजन समाज पार्टी (BSP) ने जाहिर केलेल्या१६ उमेदवारांची पहिल्या यादीत पक्षाने मुरादाबादमधून मोहम्मद इरफान सैफी, अमरोहामधून मुजाहिद हुसेन, सहारनपूरमधून माजिद अली, रामपूरमधून जीशान खान, पीलीभीतमधून अनिस अहमद खान उर्फ फूल बाबू, संभलमधून शौकत अली, आओनलामधून आबिद अली, सुरेंद्र सिंग पाल यांना तिकीट दिले. नगीना, बुलंदशहरचे गिरीश चंद्र जाटव, शाहजहांपूरचे दोद्रम वर्मा, बिजनौरचे विजेंद्र सिंग, बागपतचे प्रवीण बन्सल, मेरठचे देवव्रत त्यागी, मुझफ्फरनगरचे दारा सिंग प्रजापती, कैरानाचे श्रीपाल सिंग आणि गौतम बुद्ध नगरचे राजेंद्र सिंग सोलंकी यांना उमेदवारी जाहिर केली.

बसपाच्या तिकीट वितरणामध्ये १६ पैकी ७ उमेदवार अल्पसंख्याक समुदायातील असून मुस्लिम पोहोचण्यावर लक्ष केंद्रित केले. बसपा या दलित-केंद्रित पक्षाने सहारनपूरमधील हाजी फजलुर रहमान आणि बिजनौरमधील मलूक नगर या दोन विद्यमान लोकसभा सदस्यांना तिकीट नाकारले आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत, BSP ने समाजवादी पार्टी (SP) सोबत युती करून ३७ संसदीय जागा लढवल्या आणि १० जागा जिंकल्या होत्या. त्यात – सहारनपूर, बिजनौर, नगीना, अमरोहा, आंबेडकर नगर, श्रावस्ती, लालगंज, घोसी, जानुपूर आणि गाझीपूर लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. उत्तर प्रदेश हे ८० लोकसभेच्या जागांसह भारतातील राजकीयदृष्ट्या सर्वात महत्त्वाचे राज्य आहे. त्यामुळे उर्वरित जागांसाठीही मायावती उमेदवार जाहिर करतील अशी अटकळ बांधण्यात येत आहे.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *