मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. तर, दुसरीकडे मराठा समाजाला सरसकट आरक्षण दिलं तर ओबीसी समाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वक्तव्य केलं आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सरकारला कायद्याचा विचार करावा लागतो. सर्वोच्च न्यायालयाचा विचार करावा लागतो. आम्ही आरक्षण दिलं तरी ते कायद्याच्या चौकटीवर टीकलं पाहिजे. नाहीतर आम्ही एखादा निर्णय घेतल्यास समाज म्हणेल की आमची फसवणूक केली. आरक्षण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, मला विश्वास आहे की सर्वांनी सकारात्मक विचार केला तर समाजाचं भलं होईल.
ओबीसींमध्ये जी भीती आहे की त्यांचं आरक्षण कमी होणार, अशा प्रकारे सरकारचा कोणताही हेतू नाही. ओबीसी समाजाने गैरसमज करू नये. दोन समाज समोरासमोर यावेत असा निर्णय राज्य सरकार घेणार नाही. कोणत्याही समाजातील नेत्याने कोणतंही स्टेटमेंट करताना कोणता समाज दुखावणार नाही, अशा प्रकारचा प्रयत्न केला पाहिजे. ओबीसी समाजालादेखील आश्वासित करू इच्छितो की ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही.