राज्यातील मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे या मागणीकरीता सुरु करण्यात आलेले मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेले आंदोलन अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सगसोयऱ्यांसंदर्भात दुरूस्ती केलेल्या अध्यादेशाचा मसुदा सुपुर्द केला. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाने केलेली मागणी राज्य सरकारने पूर्ण केली असल्याने मराठा समाजाचे आंदोलन मागे घेत असल्याचे जाहिर करत आता हा अध्यादेश टिकविण्याची जबाबदारी राज्य सरकारची असल्याचे सांगत सर्व सग्या सोयऱ्यांनी आता जात प्रमाणपत्र घ्यावे असे आवाहन केले.
मराठा समाजाला स्वंतत्र्य आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाचे ठिकाण बदलत मुंबईत येण्याचा इशारा दिला होता. तत्पूर्वी राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा मोर्चाला नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्येच थोपवून धरले. तसेच मनोज जरांगे पाटील यांन राज्य सरकारला आजचा शेवटचा दिवस दिला होता. त्यानुसार सकाळी ९ च्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर सहकारी मंत्र्यांनी नवी मुंबईत पोहोचत मनोज जरांगे पाटील यांनी मागणी केल्याप्रमाणे सगेसोयरे या शब्दाचा समावेश नियमावलीत करण्याचा नवा मसुदा हाती सोपविला. आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते फळांचा रस पित आपले उपोषणाचे आंदोलन थांबवित असल्याचे जाहिर केले.
आंदोलन मागे घेतल्याचे जाहिर केल्यानंतर मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठा समाजाने मागणी केल्याप्रमाणे राज्य सरकारने आज नवा अध्यादेश जारी केला आहे. आता हा अध्यादेश न्यायालयात टीकविण्याची जबाबदारी राज्य सरकारची असल्याचा पुर्नरूच्चार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरच केला. तसेच राज्यातील मराठा आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यासंदर्भात राज्य सरकारने लेखी आश्वासन दिले आहे. त्यानुसार पुढील कारवाई लवकरात लवकर करावी अशी मागणीही यावेळी मुख्यमंत्र्यांना केली.
यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, जर या अध्यादेशाला जर काही दगा फटका झाला तर पुन्हा मुंबईतल्या आझाद मैदानावर थेट आंदोलन सुरु करणार असल्याचा इशारा राज्य सरकारला देत मराठा समाजाला दिलेल्या शब्दानुसार आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. त्यामुळे मराठा समाजातील नागरिकांनी कुणबी जातीचा दाखल घेण्यासाठी अर्ज करावेत आणि ते दाखले तात्काळ घ्यावेत विशेषतः दोन्ही बाजू कडील लोकांना माझे आवाहन असल्याचे सांगितले.
तसेच पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, काही जण मराठा आणि ओबीसी समाजामध्ये भांडण लावू पहात आहेत. मात्र गाव-खेड्यात ओबीसी आणि मराठा हे भावाप्रमाणे रहात असून त्यांच्यात आणि आमच्यात कोणत्याही पध्दतीची भांडणे नाहीत आणि होणार नाही असेही जाहिर केले.