राज्याच्या राजकारणात काँग्रेसकडून काहीसे अडगळीत गेलेल्या माजी खासदार मिलिंद देवरा आणि सध्या मराठवाड्यातील मराठा विरूध्द ओबीसी राजकारणात स्पष्ट भूमिका न घेणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करत आगामी खासदारकीचे तिकिट मागील महिन्यातच बुक करून ठेवले. तर काही काळ राज्याच्या राजकारणातून बाजूला सरकण्यासाठी अशोक चव्हाण यांनी राज्यसभेची जागा दोन दिवसात बुक करत भाजपात प्रवेश केला. त्यानुसार मुख्यमंत्री शिंदे गटाकडून राज्यसभेच्या जागेसाठी मिलिंद देवरा यांचे नाव जाहिर केले. तर अशोक चव्हाण यांचे नाव भाजपाने जाहिर केले.
याशिवाय मागील १० वर्षापासून पुर्नवसनाच्या शोधात असलेल्या भाजपाच्या कोथरूडच्या निष्ठावान अभ्यासू आमदार मेधा कुलकर्णी यांचे अखेर १० वर्षाच्या कालखंडानंतर राजकिय पुर्नवसन भाजपाने केले. यापूर्वी कोथरूड विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडूण गेल्या होत्या. मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत मंत्री तथा माजी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठी सुरक्षित मतदारसंघ म्हणून आमदारकीसाठी मोकळा दिला. परंतु १० वर्षे झाले तरी मेधा कुलकर्णी यांचे राजकिय पुर्नवसन होत नव्हते. मध्यंतरी राज्याच्या बकालीकरणावर आणि शहरीकरणाच्या मुद्यावरून ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या अहवालाचा आधार घेत आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला. त्यानंतर अखेर मेधा कुलकर्णी यांच्या पुर्नवसनाचा निर्णय घेत राज्यसभेसाठी उमेदवारी निश्चित केली.
तर भाजपाचेच निष्ठावंत परंतु काहीसे दुर्लक्षित राहिलेले डॉ अजित गोपचडे हे भाजपाच्या डॉक्टर सेलचे अध्यक्ष होते. मात्र त्यांना भाजपाने मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न कधी केला नव्हता. अखेर डॉ अजित गोपचडे यांना राज्यसभेसाठी उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. मात्र अजित पवार गटाकडून अद्याप उमेदवार जाहिर केला नाही. त्यामुळे अजित पवार गटाकडून जर त्यांच्या वाट्याला आलेल्या जागेवर जर उमेदवार दिला नाही तर ती जागा भाजपाकडून उमेदवार देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवत राजकिय पुर्नवसन करण्याच्या हालचाली भाजापाकडून सुरु झाल्या होत्या. मात्र मध्यंतरीच्या काळात पंकजा मुंडे यांच्या गाडीला अपघात झाल्याने जखमी झाल्या होत्या. पंकजा मुंडे यांची विचारपूस करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडच्या भगवान गडावरही जाऊनही आले. पण पंकजा मुंडे यांनी राज्यसभेवर जाण्यास विशेष रस दाखविला नसल्याची चर्चा भाजपाच्या वर्तुळात चांगली रंगली. त्यामुळेच डॉ अजित गोपचडे यांना आयत्या वेळी राज्यसभेकरिता उमेदवारी जाहिर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
तर शिवसेनेत फुट पा़डल्यानंतर शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यासाठी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी पाठबळ देण्यासाठी नारायण राणे यांना राज्यसभेवर घेत केद्रिय मंत्रीपदाची धुरा दिली. मात्र नारायण राणे यांचा केंद्रिय मंत्रिमंडळात समावेश करूनही भाजपाला फायदा आणि उद्धव ठाकरे यांचे नुकसान काही झाले नाही. त्यामुळे अखेर नारायण राणे यांना पुन्हा एकदा राज्यसभेसाठी उमेदवारी दिली नाही.