मुंबईः प्रतिनिधी
राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. मात्र या घोषणेचे लाभार्थीच सापडत नसल्याचे सांगत लाभार्थी माहीत होण्यासाठी राज्य सरकारने कर्ममाफीच्या लाभार्थ्यांची यादी जाहीर करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकारकडे केली.
मंत्रालयात आज आलेल्या खा. राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना वरील मागणी केली.
आघाडी सरकारच्या काळात जशी कर्जमाफीच्या योजनेत घोळ झाला. त्या पध्दतीने भाजप सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीत घोळ झाले असल्याची शक्यता आहे. त्यामुळेच एकाबाजूला राज्य सरकार अमुक लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ झाल्याचे सांगते. मात्र प्रत्यक्षात कोणाला लाभ झाला याची माहिती घ्यायला गेले तर लाभार्थीच सापडत नाही. हे मी राजकिय हेतूने नाही तर वास्तव परिस्थिती असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
याशिवाय शेतकऱ्यांच्या खात्यातही खरेच पैसे जमा झालेत का? याचीही माहिती तपासून पाह्यला हवी असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी दोंडाईचा येथील सोलर पार्कसाठी अवैध पध्दतीने जमिनीची खरेदी करणाऱे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी केलेली खरेदी चुकीची असल्याचे सांगत एकदा नोटीफायड झालेली जमिनीची खरेदी–विक्री–खातेफोड करता येवू शकत नाही. तसेच रावल यांना किती लाभ मिळाला याची चौकशीही होण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली.