राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यकारी अध्यक्षांची निवड करणे, याला भाकरी फिरवणे म्हणतात, असं मला वाटत नाही. ही निव्वळ धूळफेक आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. राष्ट्रवादीने काय करावं, हा आमचा अंतर्गत प्रश्न आहे, असं अजित पवारांनी म्हटलं आहे. ते साताऱ्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यकारी अध्यक्षांची निवड करणे याला भाकरी फिरवणे म्हणतात, असं मला वाटत नाही. ही तर निव्वळ धूळफेक आहे. राष्ट्रवादीतील फेरबदल किंवा अजित पवार नाराज असणे, हा त्यांच्या पक्षांतर्गत विषय आहे. मात्र, याला भाकरी फिरवणे म्हणत नाही. तर ही धुळफेक आहे. तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे.
याबद्दल अजित पवार यांना विचारल्यावर ते म्हणाले, शरद पवार भाकरी फिरवण्याबद्दल काही बोलले का? भाकरी फिरवली हे माध्यमांनी चालवलं. देवेंद्र फडणवीस एका राष्ट्रीय पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांनी काय म्हणावं, हा त्यांचा अधिकार आहे. पण, पक्षांतर्गत भाजपाने काय करावं, हा त्यांचा प्रश्न आहे. तसा राष्ट्रवादीने काय करावं, हा आमचा अंतर्गत प्रश्न आहे.
आमची आणि त्यांची विचारधारा वेगळी आहे. त्यामुळे टीका-टिप्पणी करणं त्यांचं काम आहे. फडणवीसांच्या बोलण्याला फार महत्वं दिलं पाहिजे, असं वाटत नाही, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.