मुंबई : प्रतिनिधी
नियोजित मुंबईतील आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र गुजरातमध्ये नेण्यास तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारचे धोरण कारणीभूत असले तरी हे केंद्र मुंबईत आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येणार आहेत. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्यानेच महाराष्ट्रातील गुंतवणूकीस गुंतवणूकदारांकडून पहिली पसंती देण्यात येते. त्यामुळे गुजरातमध्ये गेलेले वित्तीय केंद्र मुंबईत परत आणणार असल्याचा निर्धार उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.
मँग्नेटीक महाराष्ट्र -२०१८ या औद्योगिक कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मेक इन इंडियात झालेल्या करारानंतरही फॉस्कॉन कंपनीने गुंतवणूक न केल्याविषयी सुभाष देसाई यांना विचारले असता ते म्हणाले, फॉस्कॉन कंपनी महाराष्ट्रात आली तर तिचे स्वागतच. पण नाही आली तरी अन्य कंपन्यांच्या माध्यमातून ३० टक्के औद्योगिक गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
मॅग्नेटिक महराष्ट्रात करण्यात येणार्या करारांमध्ये रत्नागिरी येथील रिफायनरीचा करार अग्रक्रमावर असल्याबाबत पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, कोणत्याही परिस्थितीत जनतेवर रिफायनरी प्रकल्प लादणार नाही. मागील अधिवेशनातच याविषयीची भूमिका आपण स्पष्ट केली होती. आज सायंकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, स्थानिक जनता आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत योग्य निर्णय घेतला जाईल.