Breaking News

पराभवाच्या छायेत असलेले काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी दिला काँग्रेसचा राजीनामा

महाराष्ट्रातील काँग्रेसचे माजी आमदार, खासदार आणि मुख्यमंत्री पद भूषविलेले अशोक चव्हाण यांनी आज अचानक काँग्रेस पक्षाच्या आमदारकीचा राजीनामा देत पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. मात्र आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत काँग्रेसचे अनेक नेते पराभवाच्या छायेत असल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. त्यातच अशोक चव्हाण यांच्या विरोधात स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी पक्ष सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिल्याचे सांगण्यात येत आहे.

मागील काही वर्षात नांदेड जिल्ह्यात मागासवर्गीय विरूध्द उच्चवर्णीय असा नवा वाद निर्माण झाला आहे. त्याचबरोबर नांदेड मधील दलित समाजाच्या व्यक्तींवर अन्याय होत असताना अशोक चव्हाण यांनी न्याय देण्याऐवजी उच्चवर्णीय समाजाची बाजू उचलून धरली. त्यातच अशोक चव्हाण यांच्या आदर्श घोटाळ्यातील सहभागावरून आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळात सरकारी अधिकाऱी पदावर नसलेल्या व्यक्तीकडून सार्वजनिक बांधकाम विभागात प्रमाणापेक्षा जास्त हस्तक्षेप वाढला होता. याविषयीचे प्रकरण त्यावेळी झालेल्या मुंबईत झालेल्या हिवाळी अधिवेशनात भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी उपस्थित केला होता. त्यातच मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावरून अशोक चव्हाण यांच्या घर आणि कार्यालयावर मराठा समुदायाच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक करण्याची घटना घडली. त्यानंतर अशोक चव्हाण यांचा आगामी निवडणूकीत पराभव अटळ असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिल्याचे सांगण्यात येत आहे.

२०१९ ला झालेल्या लोकसभा निवडणूकीत अशोक चव्हाण यांचे कट्टर विरोधक खासदार प्रताप चिखलीकर, माजी सनदी अधिकारी आणि आमदार शिंदे यांच्याकडून सातत्याने अशोक चव्हाण यांच्या वाढलेल्या प्रभावाला पध्दतशीर रोखून धरत आहेत. त्यामुळे २०१९ च्या लोकसभेच्या निवडणूकीत काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाल्याचे बोलले जात आहे. तसेच नांदेड जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीचा प्रभाव वाढत असल्याने दलित आणि मुस्लिम मतदारांनी अशोक चव्हाण यांच्याऐवजी वंचितला पाठिंबा देणे पसंत केले. त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत त्याचा राजकिय फटका अशोक चव्हाण यांना बसण्याची शक्यता अधिक वर्तविली जात आहे. त्यामुळेच अखेर आदर्शसह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ईडी कारवाई होऊ नये यासाठीच अशोक चव्हाण हे लवकरच भाजपात जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

Check Also

मुख्यमंत्री शिंदे यांची टीका, उबाठा रंग बदलणारा सरडा

युतीमध्ये असताना उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुणगान गात होते. आता मोदी यांच्या नावाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *