Breaking News

सर्वसामान्यांची दिवाळी गोड होणार, फक्त दोन दिवस शिधाजिन्नस संच रेशनिंग दुकानांवर उपलब्ध होणार-अन्न व नागरी मंत्री रविंद्र चव्हाण

राज्यातील सर्व सामान्यांची दिवाळी गोड जावी आणि रेशनिंग दुकानांवर धान्य घेणाऱ्या लाखो नागरिकांना दिवाळी सणानिमित्त चार वस्तू फक्त १०० रुपयांत देण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला. सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर या वस्तू जनसामान्यांपर्यंत अल्पकालावधीत पोहोचविण्याच्या दृष्टीने विभागाचे प्रयत्न सुरु आहेत. सर्वांची दिवाळी गोड व्हावी हेच आमचे ध्येय आहे. १९ व २० ऑक्टोंबर पर्यंत या चारही वस्तू जिल्हापातळीवर सर्व रेशनिंग दुकानांवर पोहचविण्यात येतील व त्यानंतर या वस्तूंचे वाटप करण्यात येईल, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना दिली.

चार वस्तूंचा पुरवठा रेशनिंग दुकानांवर योग्यपध्दतीने होण्याच्या दृष्टीने मंत्री रविंद्र चव्हाण स्वत: लक्ष घालत असून त्यांनी आज राज्यातील विभागाच्या अधिकाऱ्यांची व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून आढावा बैठक संपन्न झाली. दिवाळीपूर्वी चार वस्तूंचा शिधाजिन्नस संच हा पात्र शिधावाटप पत्रिकाधारकांपर्यंत योग्य पध्दतीने लवकरात लवकर कसा वितरीत होईल याचे नियोजन करा, असे निर्देश मंत्री चव्हाण यांनी या बैठकीत दिले. या प्रसंगी अन्न नागरी पुरवठा विभागाचे सचिव विजय वाघमारे, नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा कान्हुराज बगाटे, उप सचिव नेत्रा मानकामे प्रत्यक्ष उपस्थित होते. तसेच, व्हीसीच्या माध्यमातून सर्व उपायुक्त पुरवठा, सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी, सर्व अन्नधान्य वितरण अधिकारी, सर्व उपनियंत्रक शिधावाटप तसेच सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की, राज्यतील अंत्योदय अन्न योजनेतील २५ लक्ष, प्राधान्य कुटूंबातील १.३७ कोटी व औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या चौदा जिल्हयांतील एपीएल (केशरी) मधील सुमारे ९ लक्ष शिधावाटप पत्रिकाधारकांना प्रति शिधापत्रिका १ शिधाजिन्नस संच वितरित करण्यात येणार आहे. असे एकूण १ कोटी ७१ लाख एवढ्या शिधापत्रिकाधारकांना सदर शिधाजिन्नस संच वितरित करण्यात येणार आहे.सदर शिधाजिन्नस संच पात्र शिधापत्रिकाधारकांना ई- पॉस प्रणालीद्वारे १०० रु. या दिवाळीसाठीच्या सवलत दराने वितरित करण्यात येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दिवाळी सणानिमित्त १ किलो रवा, १ किलो चणाडाळ, १ किलो साखर व १ लिटर पामतेल या चार वस्तू प्रत्यक्षात वेगवेगळ्या ठिकाणांवरुन रेशनिंग दुकानांपर्यंत अथवा रेशनिंग गोदामात पोहोचणार आहेत. आणि, शिधावाटप धारकांना त्यांचे एकत्रित वितरण केले जाणार आहे. या योजनेचा लाभ अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंबातील शिधावाटप पत्रिका धारकांना तसेच पात्र एपीएल (केशरी), शेतकरी शिधावाटप पत्रिका धारकांना दिवाळी निमित्त या योजनेचा लाभ मिळणार आहे, असेही मंत्री चव्हाण यांनी सांगितले.

राज्यातील गोरगरिबांची दिवाळी गोड जावी या उद्देशाने शिंदे फडणवीस सरकारने घेतलेला हा निर्णय अतिशय पारदर्शक आहे. त्या दृष्टीने निविदा प्रक्रिया योग्य पध्दतीने राबविण्यात आली. ९ निविदा प्राप्त झाल्या होत्या त्यापैकी ६ कंपन्या पात्र ठरल्या, त्यापैकी ५ कंपन्यांनी सहभाग घेतला. या निविदांमध्ये सर्वात कमी दर रु. २७९ असलेल्या महाराष्ट्र स्टेट को.ऑ.कन्झ्युमर फेडरेशन लिमिटेड मुंबई यांना हे काम देण्यात आले, असेही चव्हाण यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले.

राज्यातील अंत्योदय अन्न योजनेतील २५ लक्ष, प्राधान्य कुटूंबातील १.३७ कोटी व औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या चौदा जिल्हयांतील एपीएल (केशरी) मधील सुमारे ९ लक्ष शिधावाटप पत्रिकाधारकांना प्रति शिधापत्रिका १ शिधाजिन्नस संच वितरित करण्यात येणार आहे. असे एकूण १ कोटी ७१ लाख एवढ्या शिधापत्रिकाधारकांना या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे, अशी माहिती मंत्री चव्हाण यांनी यावेळी दिली.

Check Also

अमित शाह यांचे अरविंद केजरीवाल यांना प्रत्युत्तर, ७५ री झाली तरी मोदीच

नरेंद्र मोदी पुन्हा देशाचे पंतप्रधान होतील आणि तिसरा कार्यकाळ पूर्ण करतील, असे केंद्रीय गृहमंत्री अमित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *