औरंगाबाद : प्रतिनिधी
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकर यांच्यातील वादावर तोडगा काढण्यासाठी व त्यांची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात एका हॉटेलमध्ये बैठक झाली. मात्र या बैठकीत हवा तसा तोडगा न निघाल्याने खोतकर यांनी काहीशा नाराजीनेच आपली तलवार म्यान करत जालन्यात युतीचा भगवा फडकाविण्याची घोषणा केली.
नाराजीवर तोडगा झालेल्या बैठकीला मुख्यमंत्री फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे यांच्यासह यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, संजय राऊत, खासदार प्रीतम मुंडे, मिलींद नार्वेकर आदी उपस्थिती होते. मुख्यमंत्री येण्यापूर्वी ठाकरे व खोतकर यांच्यात चर्चा झाली. तेव्हा खोतकरांनी त्यांच्यासमोर दानवे यांनी केलेल्या षडयंत्राचा पाडा वाचला. या बैठकीदरम्यान असे काय घडले की ठाकरे यांनी सांगूनही खोतकर ऐकावयास तयार नव्हते, हे मात्र कळू शकलेले नव्हते. दुपारच्या सुमारास मुख्यमंत्री दाखल झाले. यावेळी त्यांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याशी दहा मिनिटे चर्चा केली. त्यानंतर बोलावणे आल्याने मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष दानवे व मुंडे उद्धव ठाकरेंच्या खोलीमध्ये गेले.
मोजून १५ मिनीटांनी सर्व नेते बाहेर पडले. यावेळी वाद मिटला का असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले की, माझ्या चेहऱ्यावर आनंद दिसत नाही का? असे सांगून त्यांनी अप्रत्यक्षरित्या वादावर पडदा पडल्याचे जाहीर केले. तसेच याबाबतची घोषणा श्रीहरी पव्हेलियन येथील युतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
मात्र १५ मिनिटे झालेल्या या चचेर्चेनंतर नाराज अर्जुन खोतकर बाहेर आले त्यांनी पक्षप्रमुखांचा आदेश मान्य करत आजपासून युतीच्या कामाला लागणार असल्याचे जाहीर केले. यावरुन या वादावर तूर्तास तरी पडदा पडल्याचे दिसून येत आहे.
या यशस्वी तोडग्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे हा फेविकोलचा मजबूत जोड असल्याचे जाहीर करत मराठवाड्यातील आठच्या आठ जागा युतीच्याच येतील असा विश्वास व्यक्त केला. तसेच यानंतर रावसाहेब दानवे यांनी खोतकर यांना मी तुम्हाला धोका दिला नाही, तुम्ही ही मला धोका देऊ नका अशी विनंती केली.